नवी दिल्ली : आदित्य तरेचे नाबाद शतक व कर्णधार पृथ्वी शॉच्या तुफानी अर्धशतकाने मुंबईने रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशला सहा गड्यांनी नमवत विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. (Mumbai defeat Uttar Pradesh and won the Vijay Hazare Cup)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या उत्तर प्रदेशने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद १५८ धावांच्या जोरावर ४ बाद ३१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने तरे (१०७ चेंडूत ११८ धावा) व पृथ्वी शॉ (३९ चेंडूत ७३ धावा) यांच्या जोरावर ४१.३ षटकांत ४ बाद ३१४ धावा केल्या.
मुंबईने चौथ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले. पृथ्वीने स्पर्धेत एकाच सत्रात ८२७ धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने सलामीवीर यशस्वी जैस्वालसह (२९) ९.१ षटकांत ८९ धावांची सलामी दिली. पाच धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने षटकार ठोकतच अर्धशतक पूर्ण केले. शिवम मावीने त्याला बाद केले. १५ षटकांत २ बाद १२७ धावांवर मुंबईकर मजबूत स्थितीत होते. तरे व शम्स मुलानी (३६) यांनी संघाला सावरले.
मुलानी व तरे यांनी ८८ धावांची भागीदारी केली. मुलानीनंतर तरे आणि शिवम दुबे यांनी चौथ्या गड्यासाठी ८८ धावा केल्या. तरेने ९१ चेंडूत लिस्ट ए मधील पहिले शतक पूर्ण केले. दुबे बाद झाल्यानंतर यश दयालने दोन चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी माधव कौशिक याने १५६ चेंडूत आपल्या डावात १५ चौकार व ४ षटकार लगावले. त्याने समर्थसोबत १२२ धावांची सलामी दिली.