दुबई : बांगलादेशविरुद्ध इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव १३० धावांनी मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर फलंदाज मयांक अगरवाल यांनी आयसीसीच्या रविवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे.
पहिल्या डावात २७ धावांच्या मोबदल्यात ३ आणि दुसऱ्या डावात ३१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेणाºया शमीने ८ स्थानांची प्रगती करताना सातवे स्थान पटकावले आहे. त्याच्या नावावर ७९० मानांकन गुणांची नोंद असून भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये कसोटीत तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या यादीत कपिल देव (८७७ गुण) आणि जसप्रीत बुमराह (८३२ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसºया स्थानी आहेत.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम २४३ धावांची खेळी करीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला २८ वर्षीय मयांक फलंदाजांच्या क्रमवारीत ११ व्या स्थानी आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या ८ कसोटी सामन्यात ८५८ धावा फटकावणाºया मयांक अगरवालच्या नावावर ६९१ मानांकन गुण आहेत.
सुरुवातीच्या ८ कसोटी सामन्यात केवळ सात फलंदाजांनी मयांकपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये आॅस्टेÑलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (१२१०), वेस्ट इंडिजचे एव्हर्टन व्हिक्स (९६८), भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर (९३८), आॅस्टेÑलियाचे मार्क टेलर (९०६), वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली (९०४), वेस्ट इंडिजचेच फ्रँक वॉरेल (८९०) आणि इंग्लंडचे हर्बर्ट सटक्लिफ (८७२) यांचा समावेश आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीत भारताच्या ४ फलंदाजांचा अव्वल दहा स्थानांमध्ये समावेश आहे. त्यात कर्णधार विराट कोहली दुसºया, चेतेश्वर पुजारा चौथ्या, अजिंक्य रहाणे पाचव्या आणि रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहेत. सध्या भारतीय फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी सातत्य राखल्यास आगामी मालिकांतून ते आपल्या क्रमवारीत आणखी सुधारणा करतील. (वृत्तसंस्था)
अश्विन अव्वल दहामध्ये
अष्टपैलू रवींद्र जडेजाने फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये चार स्थानांची प्रगती केली असून तो संयुक्तपणे ३५ व्या स्थानी दाखल झाला आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (२० व्या) आणि उमेश यादव (२२ व्या) यांनीही प्रत्येकी एका स्थानाची सुधारणा केली आहे. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन अव्वल १० मध्ये सामील आहे तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी दाखल झाला आहे.
भारताची स्थिती मजबूत
दरम्यान भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. भारताच्या खात्यावर ३०० गुण असून श्रीलंका व न्यूझीलंड प्रत्येकी ६० गुणांसह संयुक्तपणे दुसºया स्थानी आहेत.