टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा ७६ धावांनी मोठा पराभव झाला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर आयसीसी स्पर्धांमधील भारतीय संघाची सलग १७ विजयांची मालिका अखेर थांबली. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने संघाच्या रणनीतीवर ताशेरे ओढले असून गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा डाव अवघ्या १११ धावांत आटोपला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा आणि लज्जास्पद पराभव ठरला आहे. संघाच्या या कामगिरीवर माजी दिग्गज मोहम्मद कैफने तीव्र नाराजी व्यक्त केली. कैफच्या मते, भारतीय संघात डावखुरे फलंदाज जास्त असणे हेच पराभवाचे मुख्य कारण ठरल्याचे त्याने म्हटले आहे.
मोहम्मद कैफ काय म्हणाला?
"भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात डावखुरे फलंदाज असल्याने विरोधी संघाला रणनीती आखणे सोपे जाते. डावखुऱ्या फलंदाजांमुळे गोलंदाजांना ठराविक टप्प्यावर मारा करणे सोपे पडते. अशा वेळी संजू सॅमसनसारख्या फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणे आवश्यक आहे. संजूचा समावेश केल्यास फलंदाजीच्या क्रमात उजव्या-डाव्या हाताचे योग्य संतुलन राहील आणि विरोधी संघाची लय बिघडवता येईल."
विजयाची मालिका संपुष्टात
२०२३ च्या विश्वचषकानंतर भारताने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात (कसोटी, वनडे आणि टी-२०) जबरदस्त कामगिरी केली होती. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सलग १७ सामने जिंकण्याचा पराक्रम भारताने केला होता. मात्र, मोक्याच्या क्षणी सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा हा विजयाचा अश्वमेध रोखून धरला.
संजू सॅमसनला संधी मिळणार का?
मोहम्मद कैफने मांडलेला मुद्दा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. टॉप ऑर्डरमधील असंतुलन दूर करण्यासाठी संघ व्यवस्थापन पुढच्या सामन्यात संजू सॅमसनचा विचार करणार का? आणि गौतम गंभीर या पराभवातून काय धडा घेणार, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.