मुंबई : भारताच्या वन डे संघात चौथ्या स्थानाचा प्रबळ दावेदार असलेल्या अंबाती रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. 2019च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील स्थान रायुडूने जवळपास निश्चित केले आहे. मात्र, एकेकाळी त्याच्यावर अन्याय झाला होता आणि त्याला भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने वाचा फोडली आहे.
भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या यो-यो फिटनेस टेस्टवर कैफने नाराजी प्रकट केली. मागील काही वर्षांत यो-यो टेस्टमध्ये 16.1 गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूंनाच भारतीय संघात स्थान दिले जात आहे. त्यावर कैफ म्हणाला,''तंदुरूस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याने संघाच्या क्षेत्ररक्षणात प्रचंड मदत होते. पण, एखादा खेळाडू सातत्याने धावा करत असेल आणि विकेटही घेत असेल, तर केवळ यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यास त्याला वगळता कामा नये.''
याच निकषाचा रायुडू बळी ठरला होता. आयपीएलमध्ये 600पेक्षा अधिक धावा करूनही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आले नव्हते. यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्याला संघाबाहेर बसवण्यात आले होते