हैदराबाद - रविवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या एका धावेने पराभूत व्हावे लागले. या लढतीत महेंद्रसिंग धोनी धावबाद होणे हे चेन्नईच्या पराभवाचे एक कारण असल्याचे मानले जात आहे. मात्र चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीने चेन्नईच्या झालेल्या पराभवाबाबत गमतीदार उत्तर दिले आहे. ही लढत अगदीच मजेशीर झाली. दोन्ही संघ एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होते, अखेरीस ज्या संघाने कमी चुका केल्या तो विजयी झाला, असे धोनी म्हणाला. या लढतीत मुंबई इंडियन्सने तीन झेल सोडले. तर चेन्नईचे दोन फलंदाज धावबाद झाले, त्याचाच धागा पकडून धोनीने हे उत्तर दिले.
केवळ 150 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना केवळ एका धावेने पराभव झाल्यानंतर धोनी म्हणाला की, ''आजचा सामना असा होता जिथे अधिक चांगली कामगिरी होऊ शकली असती. गी लढत खूपच मजेशीर झाली. दोन्ही संघ एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होते. दोघांनीही चुका केल्या. अखेरीस ज्या संघाने कमी चुका केल्या तिचा विजय झाला.''
मात्र चेन्नई सुपरकिंग्सचा संघ अंतिम सामना खेळला असला तरी यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी अपेक्षेनुरूप झाली नसल्याचे धोनीने सांगितले. ''यंदाच्या स्पर्धेत आमच्या संघाची मधली फळी फारशी चालली नाही. तरीही आम्ही अखेरपर्यंत स्पर्धेत टिकून राहिलो. मात्र आमच्या गोलंदाजांनी स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली.''
आता आयपीएल संपली आहे. आता आपले संपूर्ण लक्ष विश्वचषकावर असेल असेही धोनी म्हणाला. ''आता माझी प्राथमिकता विश्वचषकाला असेल, चेन्नईबाबत आता नंतर बोलता येईल. पुढच्या वर्षीचा विचार केल्यास चेन्नईच्या संघाची गोलंदाजी चांगली आहे. मात्र फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल.''