Join us

Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indiansचं पराभवाचं रडगाणं सुरूच! KKRचा ५२ धावांनी दणदणीत विजय

अवघ्या ११३ धावांत आटोपला मुंबईचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 23:34 IST

Open in App

Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या संघाला दोन विजयानंतर पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागले. १६६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण डाव अवघ्या ११३ धावांमध्ये आटोपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने पाच बळी घेत दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि इतर गोलंदाजांनी अचूक मारा करत कोलकाताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे कोलकाताचे प्ले-ऑफमधील आव्हान अद्यापही जिवंत आहे.

--

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर जोडीला संधी दिली. त्यांनी अर्धशतकी सलामी दिली, पण अय्यरचं अर्धशतक हुकलं. तो २४ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेने २५ धावा केल्या. त्यानंतर नितीश राणाने फटकेबाजी करत २६ चेंडूत ४३ धावा कुटल्या. पण १४व्या षटकानंतर बुमराह नावाच्या वादळाने कोलकाताचा डाव उधळून लावला. श्रेयस अय्यरला मुरूगन अश्विनने ६ धावांत माघारी धाडल्यानंतर बुमराह गोलंदाजीसाठी आला. त्याने डावाच्या १५व्या षटकात आधी आंद्रे रसलला ९ धावांवर तर सेट झालेल्या नितीश राणाला ४३ धावांवर बाद केले. त्यानंतर डावाच्या १७व्या षटकात बुमराहने एकही धाव न देता तब्बल तीन बळी घेतले. त्याने पहिल्या चेंडूवर शेल्डन जॅक्सनला ५, तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सला शून्य तर चौथ्या चेंडूवर सुनील नरिनला शून्यावर बाद केले. त्यानंतर डॅनियल सॅम्सने टीम साऊदीला शून्यावर माघारी पाठवले. अखेरच्या षटकात बुमराहने केवळ एक धाव दिली. त्यामुळे १४व्या षटकात ४ बाद १३६ धावांवर असलेला KKRचा संघ केवळ १६५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा २ धावांवर पहिल्याच षटकात बाद झाला. त्याला बाद ठरवण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यानंतर भरवशाच्या मधल्या फळीने तसेच सर्वच फलंदाजांनी चाहत्यांना पुन्हा एकदा नाराज केले. तिलक वर्मा (६), रमणदीप सिंग (१२), टीम डेव्हि़ड (१३), किरॉन पोलार्ड (१५), डॅनियल सॅम्स (१), मुरूगन अश्विन (०), कुमार कार्तिकेय (३) आणि जसप्रीत बुमराह (०) हे सर्व फलंदाज केवळ हजेरी लावण्यापुरते मैदानात आले आणि माघारी गेले. सलामीवीर इशान किशनने एकाकी झुंज देत ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. पण त्याला कोणाचीच साथ मिळाली नाही, त्यामुळे मुंबईचा डाव ११३ धावांत आटोपला. पॅट कमिन्सने एकाच षटकात मुंबईचे ३ बळी घेत डावाला सुरूंग लावला. तर आंद्रे रसेलने २, टीम साऊदीने १ आणि वरूण चक्रवर्तीने १ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सरोहित शर्माजसप्रित बुमराह
Open in App