IRE vs ZIM, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ‘ब’ गटातील आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामना श्रीलंकेतील कँडी येथील पल्लेकेलेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. झिम्बाब्वेपेक्षाही हा सामना ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण पल्लेकलच्या मैदानात पाऊस पडत असल्यामुळे सामना झाला नाही तर काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. इथं जाणून घेऊयात झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाला तर कुणाला फायदा होईल त्यासंदर्भातील सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
झिम्बाब्वे टेन्शन फ्री, ऑस्ट्रेलियासह आयर्लंडचा पत्ता होईल कट, कारण...
झिम्बाब्वेच्या संघाने पहिल्या दोन सामन्यातील लढतीसह ४ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाच्या खात्यात ३ सामन्यानंतर प्रत्येकी २-२ गुण जमा आहेत. जर सामना रद्द झाला तर त्याचा थेट फायदा झिम्बाब्वेला होईल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाला प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. या परिस्थितीत आयर्लंड ३ गुणासह सुपपर ८ च्या शर्यतीतून आउट होईल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचाही फक्त एक सामना उरला आहे. हा सामना जिंकूनही ते ४ गुणांपर्यंतच मजल मारू शकतील. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झालेला एक गुण झिम्बाब्वेच्या संघाचे सुपर ८ मधील स्थान पक्का करण्यासाठी पुरेसा ठरेल.
झिम्बाब्वेनं दुसऱ्यांदा केली कांगारूंची शिकार! इथं पाहा T20 World Cup इतिहासातील ५ मोठे उलटफेर
२००९ नंतर पहिल्यांदा ओढावणार ही नामुष्की
टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात याआधी एकदाच ऑस्ट्रेलियन संघावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. २००९ चा वर्ल्ड कप कांगारुंच्या संघासाठी भयावह स्वप्नासारखा होता. आता यंदाच्या हंगामातही त्यांच्यावर दुसऱ्यांदी ही वेळ ओढावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
झिम्बाब्वे पावसाच्या मेहरबानीवर नाही तर हिंमतीने ठोकलीये दावेदारी
टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात झिम्बाब्वे हा नेहमीच संघर्ष करताना दिसला आहे. साखळी फेरीतून कधीच पुढे गेलेला नाही. पण सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील संघाने नवा इतिहास रचण्याचे संकेत दिले आहे. पावसामुळे त्यांची दावेदारी भक्कम झालेली नाही तर सर्वोत्तम खेळ करत त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. याउलट ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.