Join us

IPL मोठी मजेशीर स्पर्धा; KKR ला हरवल्यानंतर असं का बरं म्हणाला रोहित शर्मा?

IPL 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:06 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट राखून विजय मिळवला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थानासह क्वालिफायर 1 मध्ये स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सला क्वालिफायर 1 मध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक भाष्य केले. तो म्हणाला, ''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो.'' ख्रिस लीनने 29 चेंडूंत 41 धावा करताना कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. त्याने शुबमन गिलच्या सोबतीनं पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. पण, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाताला धक्के देण्याचे सत्र सुरु केले. लसिथ मलिंगाने कोलकाताचा हुकुमी एक्का आंद्रे रसेलला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने कोलकाताचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले आणि त्यामुळे पाहुण्यांना 7 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. रॉबीन उथप्पाने 47 चेंडूंत 40 धावा केल्या.''आयपीएल मजेशीर स्पर्धा आहे. कोणताही संघ कोणालाही नमवू शकतो आणि त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे पाऊल उचलावे लागतात,'' असे रोहित म्हणाला. मुंबई इंडियन्सचा संघ पुनरागमन करण्यात तरबेज म्हणून ओळखला जातो. यापूर्वीच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळालेले हेच चित्र यंदाही दिसले. निराशाजनक सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने कमबॅक करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तो म्हणाला,''आयपीएल ही व्यावसायिक स्पर्धा आहे, हे सर्वांना माहित आहे. आम्ही नेहमीच दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी केलेली आहे. तो आमचा इतिहासच आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने व्यावसायिक दृष्टीकोनातून खेळ केला आणि म्हणूनच आम्ही तीनही जेतेपद जिंकू शकलो.''

टॅग्स :आयपीएल 2019रोहित शर्मामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स