जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेली आयपीएल वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा या लीगमध्ये आठ संघ खेळायचे. तसेच हे आठ संघ एकमेकांविरुद्ध होम आणि अवे अशा मिळून १४ साखळी लढती खेळायचे. मात्र आता आयपीएलमधील संघांची संख्या वाढून १० झाली आहे. पण साखळी लढतींची संख्या १४ एवढीच राहिली आहे. तसेच स्पर्धेत काही संघ एकमेकांविरुद्ध एकच सामना खेळतात, तर काही संघांविरुद्ध दोन सामने खेळतात. त्यामुळे कुठला संघ कुठल्या संघाविरुद्ध एक सामना खेळेल आणि कुठल्या संघाविरुद्ध दोन सामने खेळेल, हे कसे निश्चित केलं जातं, असा प्रश्न आयपीएलचं वेळापत्रक पाहिल्यावर सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना नेहमीच पडतो. आता कुठला संघ कुठल्या संघाविरुद्ध किती सामने खेळणार, हे कसं निश्चित केलं जातं याचं गुपित उघड झालं आहे.
खरंतर आयपीएलमधील सामने हे साखळी पद्धतीने खेळवले जातात. यात प्रत्येक संघाला १४ सामने खेळायला मिळतात. त्यामधील ७ सामने हे घरच्या मैदानावर आणि ७ सामने हे बाहेर खेळावे लागतात. सध्या आयपीएलमध्ये दहा संघ असल्याने प्रत्येक संघाने जर विरोधी संघाविरुद्ध २ सामने खेळले तर स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढू शकते. तसेच त्याचा परिणाम स्पर्धेच्या वेळापत्रकासह खेळाडूंवरील वर्कलोड, प्रसारणाची गणिते, यावर होऊ शकतो. त्यामुळे आयपीएलच्या साखळी लढतींसााठी १८ ऐवजी १४ सामन्यांचंच वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.
यासाठी आयपीएलने स्पर्धेतील संघांमध्ये एक ग्रुप सिस्टिम तयार केली आहे. त्यात संतुलन साधण्यासाठी १० संघांना प्रत्येकी ५ अशा दोन गटांत विभागण्यात येते. यंदाच्या आयपीएलसाठीही संघांची अशी विभागणी झालेली आहे. त्यात अ गटामध्ये चेन्नई, कोलकाता, राजस्थान, बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांचा समावेश आहे. तर ब गटामध्ये मुंबई इंडियन्स, हैदराबाद, गुजरात, दिल्ली आणि लखनौ या पाच संघांचा समावेश आहे. स्पर्धेतील संतुलन कायम राहावं यासाठी ही विभागणी हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी निश्चित केली जाते.
साधं सरळ सामन्यांचं गणित
या फॉरमॅटमधील सर्वात सोपी पद्धत म्हणजे प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर ४ संघांविरुद्ध केवळ १-१ सामना खेळतो. तर दुसऱ्या संघांतील सर्व ५ संघांविरुद्ध दोन दोन सामने खेळतो. त्यामुळे आपल्या गटातील संघांविरुद्धचे ४ आणि दुसऱ्या गटातील संघांसोबतचे १० मिळून १४ सामन्यांसह प्रत्येक संघाची गटसाखळी पूर्ण होते.
मात्र या प्रणालीमधील एक मोठा दोष म्हणजे ही प्रणाली गणितीय दृष्ट्या संतुलित दिसते, पण व्यावहारिकदृष्ट्या त्यामध्ये थोडंस असंतुलन दिसून येतं. यात एखाद्या संघाला अधिक प्रबळ असलेल्या संघाविरुद्ध दोन सामने खेळावे लागतात. तर तर एखाद्या संघाला तुलनेने कमकुवत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन सामने खेळायला मिळतात. एखादा संघ चांगला फॉर्ममध्ये असेल तर त्याच्याविरुद्धचे दोन सामने खेळताना आव्हान वाढू शकते. तक दुबळ्या संघाविरुद्ध खेळताना फायदा होऊ शकतो.
एवढंच नाही तर आयपीएलचं हे फॉरमॅट केवळ खेळापर्यंतच मर्यादित नाही आहे. तर त्यामध्ये प्रसारणकर्ते, प्रेक्षकांची आवड, स्पर्धेची कालमर्यादा अशा बाबींचाही विचार केला जातो. अधिक सामने असल्यास स्पर्धेचा हंगाम लांबून खेळाडू थकण्याची शक्यता असते. त्यामुळे १४ सामन्यांचं फॉरमॅट हेच अधिक उपयुक्त मानलं जातं.