आयपीएलमध्ये काल रात्री गुवाहाटी येथे झालेल्या लढतील राजस्थान रॉयल्सनेमुंबई इंडियन्सवर २७ धावांनी विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी केलेली विस्फोटक फलंदाजी हे राजस्थानच्या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. दरम्यान, राजस्थानकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या हा निराश झाला असून, त्याने या पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडले आहे.
हार्दिक पांड्याने सांगितले की, पॉवर प्लेमध्ये आमचा संघ आपल्या योजनेनुसार गोलंदाजी करू शकला नाही. उलट राजस्थानच्या सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली. आमच्या संघाचे गोलंदाज अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकले नाहीत. या सामन्यातील पराभवासाठी मी फलंदाजांना जबाबदार धरणार नाही, तर गोलंदाजांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असेही हार्दिक पांड्याने सुनावले.
दरम्यान, काल झालेल्या लढतीत यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी राजस्थान रॉयल्सच्या विजयाची पायाभरणी केली. पावसाचा व्यत्यय आल्याने प्रत्येकी ११ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यात यशस्वी जयस्वालने ३२ चेंडूत नाबाद ७७ धावा, तर वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूत ३९ धावा फटकावल्या. या दोघांनीही पहिल्या पाच षटकांमध्येच ८० धावा कुटून काढत मुंभई इंडियन्सला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलले.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं. एवढ्या कमी वयामध्ये अशा प्रकारची निडर फलंदाजी करताना पाहणे अद्भूत आहे. मी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करतो, असे पांड्या म्हणाला.