मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिलेल्या विक्रमी २४१ धावांचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. MI च्या सलामी जोडीनं पहिल्या पाच षटकात आक्रमक फलंदाजी करत धावफलकावर ५२ धावा लावल्या. पण सहाव्या षटकात रोहित शर्मानं रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. हा मुंबई इंडियन्सला मोठा धक्काच होता. नेमक काय घडलं? विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मानं का सोडलं मैदान? जाणून घेऊयात सविस्तर
...अन् रोहितनं घेतला मैदान सोडण्याचा निर्णय
रोहित शर्मानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात आपल्या भात्यातील खास फटकेबाजीचा नजराणा पेश केला. २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १३ चेंडूत १९ धावा करत त्याने चांगली सुरुवात केली होती. पण रसिख सलाम घेऊन आलेल्या सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वेदनेनं व्याकूळ होत त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. स्नायू दुखापतीमुळे त्रस्त असल्यामुळे त्याच्यावर मैदान सोडण्याची वेळ आली.
तो रिटायर्ड हर्ट होऊन परतल्यावर MI ला धक्क्यावर धक्के
खेळाडू रिटायर्ड हर्ट झाल्यावरही वेळप्रसंगी पुन्हा मैदानात उतरू शकतो. त्याची दुखापत किती गंभीर आहे त्याचा अंदाज लावणे कठीण आहे. तो पुन्हा येईल का? हा प्रश्न निर्माण झाला असताना RCB नं या संधीचा फायदा उचलत रायन रिकल्टन आणि तिलक वर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के दिले.
RCB कडून तीन अर्धशतकवीरांसह टिम डेविडचा धमाका
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून फिल सॉल्ट ७८ (३६), विराट कोहली ५० (३८) आणि कर्णधार रजत पाटीदार ५३ (२०) या तिघांच्या धमाकेदार अर्धशतकाशिवाय टिम डेविडनं १६ चेंडूत कुटलेल्या ३४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने २०४० धावा केल्या. IPL मध्ये सलग चौथ्यांदा २०० पेक्षा अधिक धावा करण्याचा खास विक्रमही त्यांनी नोंदवला.