IPL 2026 Royal Challengers Bengaluru Won By 18 Runs Against Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला असलेल्या वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पुन्हा एकदा हवा केली. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगाातील रविवारी खेळवण्यात आलेल्या १९ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्ससमोर २४१ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ५ बाद २२२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. स्नायू दुखापतीमुळे पॉवर प्लेमध्ये सलामीवीर रोहित शर्मानं मैदान सोडलं तिथंच RCB नं सामन्यावर पकड मिळवली. शेरफेन रुदरफोर्डच्या नाबाद अर्धशतकाशिवाय हार्दिक पांड्याच्या २२ चेंडूतील ४० धावांच्या खेळीशिवाय एकालाही धमक दाखवता आली नाही. गत हंगामात दहा वर्षांनी RCB नं वानखेडेवर विजय नोंदवला होता. हा सिलसिला यंदाच्या हंगामातही त्यांनी कायम ठेवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मानं मैदान सोडताच RCB नं उचलला फायदा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या विक्रमी धावंसख्येचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३२ चेंडूत ५७ धावांची भागीदारी रचली होती. पण पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात रोहित शर्मानं स्नायू दुखापतीमुळे त्रस्त असल्यामुळे मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा घेत RCB नं सलामीवीर रायन रिकल्टन ३७ (२२) आणि तिलक वर्मा १ (३) यांच्या रुपात मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के दिले. संघाला गरज असताना सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ३३ धावा करून परतला अन् मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत सापडला.
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
हार्दिक पांड्या शेरफेन रुदरफोर्डची फटकेबाजी, पण शेवटी MI कमी पडली
आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यावर कर्णधार हार्दिक पांड्याने काही सुरेख फटके खेळत संघाच्या आशा पल्लवित केल्या. पण ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २२ चेंडूत ४० धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. MI चा संघावर मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना शेरफेन रुदरफोर्ड याने ३१ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा मोठा पराभव टळला. गोलंदाजीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून सूयश शर्मा याने सर्वाधिक २ तर क्रुणाल पांड्या, रसिख दार आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
RCB च्या ताफ्यातून तिघांची अर्धशतके
पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्ट ७८ (३६) आणि विराट कोहली ५० (३८) यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १२० धावांची दमदार भागीदारी रचली. या दोघांनी आपली जबाबदारी चोख बजावल्यावर कर्णधार रजत पाटीदार याने अवघ्या २० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची कडक खेळी केली. अखेरच्या षटकात टिम डेविड याने १६ चेंडूत केलेल्या ३४ धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २४० धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २४१ धावांचे विक्रमी टार्गेट सेट केले होते. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला.