गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला २७ धावांनी पराभवाचा स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी संघाच्या गोलंदाजीच्या रणनीतीवर बोट ठेवले असून, विशेषतः सुरुवातीच्या षटकांत आखलेली रणनीती अपयशी ठरल्यामुळे मुंबईच्या पदरात निराशा पडली.
पावसामुळे राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामना फक्त ११ षटकांचा करण्यात आला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेले राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या पाच षटकांतच ८० धावांचा पाऊस पाडत मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. या वादळी सुरुवातीमुळे मुंबईचा संघ दबावाखाली आला आणि त्यातून सावरणे त्यांना कठीण झाले. राजस्थानच्या संघाने मुंबईसमोर ११ षटकांत ३ विकेट्स गमावून १५१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारू शकला. या पराभवानंतर मुबईचे प्रशिक्षक महिला जयवर्धने नाराजी व्यक्त केली.
जयवर्धने काय म्हणाले?
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयवर्धने म्हणाले की, "आमच्याकडे जैस्वाल आणि सूर्यवंशी यांच्यासाठी प्लॅन तयार होता. पण आमच्या गोलंदाजांची लाईन आणि लेंथ चुकली आणि त्याचा फायदा राजस्थानच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करून घेतला. त्यानंतर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आघाडीच्या फलंदाजांनी थोडी जबाबदारी घेतली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असू शकले असते. संघाला एका चांगल्या भागीदारीची गरज होती, पण सुरुवातीलाच विकेट्स गमावल्यामुळे लय बिघडली. विजयाचा फरक केवळ ४ षटकारांचा होता, जो गाठणे अशक्य नव्हते. आघाडीच्या फळीतील फलंदाज ३०-४० धावांची जलद खेळी करण्यात अपयशी ठरले. पुढील सामन्यात या चुका टाळून संघ पुन्हा लयीत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मिचेल सँटनरच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती
महत्त्वाच्या सामन्यात फिरकीपटू मिचेल सँटनर संघात नसल्याबाबत स्पष्टीकरण देताना जयवर्धने म्हणाले की, त्याला मागील सामन्यात किरकोळ दुखापत झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली होती. पुढील सामन्यापर्यंत तो १०० टक्के तंदुरुस्त होऊन पुनरागमन करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.