इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये सध्या खेळाडूंच्या अनोख्या सेलिब्रेशन्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आकाश सिंगचे चिट सेलीब्रेशन क्रिकेट जगतातील दिग्गजांना अजिबात आवडलेली नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदज डेल स्टेन यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा सेलिब्रेशनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत आकाशने २६ धावांत ३ विकेट्स घेतले. मात्र, विकेट घेतल्यानंतर खिशातून कागदाची चिठ्ठी काढून दाखवण्याची त्याची ही स्टाईल क्रिकेट जगतातील दिग्गजांना अजिबात आवडलेली नाही. सामन्यादरम्यान आकाश सिंगने प्रत्येक वेळी विकेट घेतल्यानंतर आपल्या खिशातून कागदाची एक छोटी चिठ्ठी बाहेर काढून कॅमेऱ्यासमोर दाखवली. या चिठ्ठीवर लिहिले होती की, "#Akkionfire — T20 सामन्यांमध्ये विकेट्स कसे घ्यायचे, हे आकाशला चांगलेच ठाऊक आहे." यावर डेल स्टेन आणि अंबाती रायडूने नाराजी व्यक्त केली.
रायडू काय म्हणाला?
ESPNcricinfo बोलताना रायडू म्हणाला की, "मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की, नेमक्या कोणत्या क्षणी आकाशच्या मनात हा विचार आला असेल की, हे दिसायला एकदम भारी वाटेल! मी माझ्या खिशातून चिठ्ठी काढेन आणि मग सर्वांना वाटेल की, मी खूप कूल आहे. पण ही कल्पना अत्यंत जबरदस्त आहे, हे त्याला कुणी पटवून दिले. काही लोकांना कदाचित यात काहीच चुकीचे वाटणार नाही. पण मला स्वतःला मात्र हे थोडेसे हास्यास्पद आणि थोडेसे मूर्खपणाचे वाटले." रायडू इथेच थांबला नाही, तर त्याने अशा प्रकारच्या सेलिब्रेशन्सवर आयपीएलमध्ये पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. खेळाडूंना मैदानात कागदाच्या चिठ्ठ्या घेऊन जाण्याची परवानगीच दिली जाऊ नये, हा 'चिठ्ठीचा धंदा'पूर्णपणे बंद झाला पाहिजे, असेही तो म्हणाला आहे.
डेल स्टेननेही सुनावले
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. स्टेन म्हणाला की, "आता या चिठ्ठ्यांचा वापर थांबवण्याची वेळ आली आहे. हा ट्रेंड आता संपला आहे आणि खरे सांगायचे तर, मुळात हा कधीच खऱ्या अर्थाने ट्रेंड नव्हता."
टीकेवर आकाश सिंगचे चोख उत्तर
चारही बाजूंनी होत असलेल्या टीकेला न जुमानता आकाश सिंगने आपल्या या स्टाईलचे समर्थन केले. हे सेलिब्रेशन आपल्याला मैदानात कामगिरी करण्यासाठी अधिक प्रेरणा देते आणि आपण ते पुढेही चालू ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. यामागे कोणताही चुकीचा हेतू नसून, सामन्यादरम्यान ज्या गोष्टींमधून आपल्याला स्फूर्ती मिळते, त्या कृती आपण पुढेही करत राहू, असा निर्धार आकाशने व्यक्त केला आहे.