अनकॅप्ड युवा बॅटर समीर रिझवी याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २०० पारची लढाई जिंकत पंजाब किंग्जचं टेन्शन वाढवलं आहे. दिल्लीच्या संघाचा स्पर्धेतील प्रवास आधीच संपुष्टात आला आहे. पण आपल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जच्या प्लेऑफ्समध्ये अव्वल दोनमध्ये एन्ट्री मारण्याच्या आशा धुसर केलीये. आता पंजाब किंग्ज संघाला साखळी फेरीतील अखेरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यातील पराभव त्यांना Qualifier 1 च्या शर्यतीतून बाहेर करेल. एवढेच नाही तर हा सामना जिंकला तरी आता टॉप २ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना अन्य निकालावर अवलंबून राहावे लागेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यरचं अर्धशतक अन् स्टॉयनिसचा धमाका
जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबच्या संघाकडून कर्णधार श्रेयस अय्यरनं ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय मार्कस स्टॉयनिस याने १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा करत संघाच्या धावफलकावर २०६ धावा लावल्या होत्या. या दोघांशिवाय जॉस इंग्लिसने १२ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. तर प्रभसिमरन सिंग याने १८ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून मुस्ताफिझुर याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. विपराज निगम आणि कुलदीप याने आपल्या खात्यात प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय मुकेश कुमारनं आपल्या खात्यात एक विकेट जमा केली.
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
करुण नायरनं सेट केला सामना, मग पिक्चरमध्ये आला समीर रिझवी
धावांचा पाठलाग करताना केएल राहुल आणि फाफ ड्युप्लेसिस या जो़डीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण केएल राहुल २१ चेंडूत ३५ धावा करून तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ फाफही २३ धावांवर माघारी फिरला. त्यानंतर करुण नायर याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने २७ चेंडूत ४४ धावा करत सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं सेट केला. सेदीकुल्ला अटल २२ धावा करून बाद झाल्यावर समीर रिझवी पिक्चरमध्ये आला. त्याने आयपीएळमधील पहिले अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. समीर रिझवीनं २५ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली. दुसऱ्या बाजूला ट्रिस्टन स्टब्स १४ चेंडूत १८ धावांवर नाबाद राहिला.
प्लेऑफ्समधील चारही संघ वेटिंगवर
प्लेऑफ्समधील एकही संघ टॉप २ मधील स्थान पक्के करू शकलेला नाही. प्लेऑफ्समध्ये अव्वलस्थानावर पोहचण्याची संधी असलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाविरुद्ध विजय नोंदवत लखनौच्या संघाने त्यांना १८ गुणांवर रोखल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला १७ गुणांवर रोखले अन् आता दिल्लीच्या संघाने पंजाबला १७ धावांवर रोखले आहे. त्यामुळे १६ गुणांवर पोहचलेल्या मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या दोनमध्ये पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.