Ashish Nehra Rishabh Pant IPL 2025: कोलकाता: आक्रमक फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत हा भीषण कार अपघातातून बचावल्यानंतर आशीष नेहरा यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. माजी वेगवान गोलंदाज नेहरा यांनी मला नेहमी आनंदी राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा सल्ला फार मोलाचा ठरल्याची कबुली सोमवारी ऋषभने दिली.
पंत हा ३० डिसेंबर २०२२ ला रात्रीच्यावेळी दिल्ली-देहरादून मार्गावर कारने जात असताना, त्याच्या नव्याकोऱ्या कारला अपघात झाला. या भीषण अपघातात कारने पेट घेतला होता. गंभीररीत्या जखमी झालेल्या ऋषभवर अनकेदा शस्त्रक्रिया करावी लागली होती. एका कार्यक्रमात बोलताना पंतने त्या घटनेचा उल्लेख करीत सांगितले की, मला आशीष नेहरा यांच्या सल्ल्याचा मोठा लाभ झाला. ते माझ्या क्लबचे वरिष्ठ खेळाडू राहिले आहेत. ते माझी प्रकृती पाहण्यासाठी आले. त्यावेळी मला अनेक जखमा असल्याचे पाहून ते म्हणाले, 'तू आता एक काम कर, केवळ आनंदी राहा!' ज्यामुळे आनंद येत राहील, असा सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला.'
२७ वर्षांचा ऋषभ पुढे म्हणाला, 'नेहरा यांचा हा सल्ला मला फार मोलाचा ठरला. जखमांवर मात करण्यास या सल्ल्याचा मोठा लाभ झाला.' पंतने शस्त्रक्रियेनंतर वर्षभर पुनर्वसन कार्यक्रमात वेळ घालविला. मागच्यावर्षी आयपीएलद्वारे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यानंतर अमेरिका-वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले होते. 'मी लहानपणापासून दिवस-रात्रीचे सामने खेळत आहे. जखमांतून सावरल्यानंतर स्वतःला सज्ज करणे माझ्यासाठी आव्हान होते. दररोज दात घासतानादेखील त्रास जाणवायचा. एकवेळ अशी आली की, कसे होणार, असा विचार यायचा, तरीही संयमी वृत्तीच्या बळावर नकारात्मकता येऊ दिली नाही.'
जेवण करणे कठीण होते. बोलता येत नव्हते. त्यावरही तोडगा काढला. या अपघातानंतर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे खेळाकडे पाहण्याची दृष्टीही बदलली. आयुष्यात काहीही सहज घ्यायचे नाही, याची खात्री पटली. व्यावसायिक खेळाडू या नात्याने धावा काढणे, क्षेत्ररक्षण करणे किंवा विक्रम नोंदविणे इतकेच आपले काम नाही, तर या पलीकडेही जग आहे, याची जाणीव झाली.
खेळात प्रत्येक दिवशी यश मिळत नाही. अपयशही पचविण्याची ताकद निर्माण करावी लागते. त्यासाठी मानसिक बळ असावे लागते. अपघाताने मला या सर्व गोष्टी शिकविल्या. दिल्ली संघ सोडल्यानंतर पंतला यंदा लखनौ संघाने मेगा लिलावात तब्बल २७ कोटी रुपये खर्चुन संघात घेतले आहे.