ठळक मुद्देमुंबई इंडियन्सला विषम वर्षीच मिळालेय यशसम वर्षी यश देते मुंबईला हुलकावणीपहिल्यांदाच सलग दुसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सने गाठली अंतिम फेरी
-ललित झांबरे
मुंबईच्या (Mumbai Indians). संघाने सहाव्यांदा आयपीएलच्या (IPL) अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिसऱ्यांदा त्यांनी पहिला क्वालिफायर (Qualifier) सामना जिंकला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांनी दिल्ली कॕपिटल्सला (Delhi Capitals) तिनही सामन्यात मात दिली आहे. गेल्या वर्षी याच प्रकारे चेन्नईला (CSK ) त्यांनी चारही सामन्यात मात दिली होती.
आता दिल्लीचा संघ क्वालिफायर दोन जिंकून अंतिम फेरीत पोहोचला तर सलग दुसऱ्या वर्षी एकाच मोसमात एकाच संघाला चारदा मात देण्याचा मुंबईसाठी योग येऊ शकतो. तसे झाल्यास असे यश मिळवणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरेल.
मुंबई इंडियन्सने ज्या ज्या वेळी आयपीएलच्या ती एकाच मोसमात एखाद्या संघाविरूध्दन किंवा अधिक सामने जिंकले आहेत. त्या त्या वर्षी ते विजेते ठरले आहेत. त्यामुळे एकप्रकारे मुंबईच्या पाचव्या आयपीएल विजेतेपदाचे हे शुभसंकेतच आहेत.
यात आणखी एक योगायोग असा की मुंबई इंडियन्सने एकाच संघाविरुध्द तीन किंवा अधिक सामने जिंकले ते आयपीएलचे सिझन होते 2013, 2015, 2017 आणि 2019! ह्या वर्षांकडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एक वर्षाआड मुंबईचा संघ विजेता ठरत आला आहे आणि प्रत्येक विषम संख्येच्या वर्षी त्यांनी ट्रॉफी उंचावली आहे.
याआधी एकदाच ते सम संख्येच्या वर्षी (2010) अंतिम फेरीत पोहोचले होते मात्र त्यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा ते सम संख्येच्या वर्षी आणि पहिल्यांदाच लागोपाठ दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे फक्त विषम वर्षी यश हा निव्वळ योगायोग होता हे दाखवून देण्याची त्यांना संधी आहे. असेही 2020 हे वर्ष सर्वच बाबतीत वेगळे ठरत आहे. आता मुंबईसाठी हे वर्ष यशाच्या बाबतीतही वेगळे ठरतेय का हे मंगळवार, 10 रोजी कळेलच.