मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या MIनं दुबईत झालेल्या IPL2020च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पण, हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर गौतम गंभीर ट्रेंड सुरू होता. त्यामागे एक मजेशीर कारण आहे.
मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनिस बाद झाला आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याल नेटिझन्सनं ट्रोल केलं. गौतमनं त्याच्या फॅन्टसी XI संघाचा कर्णधार स्टॉयनिसला केलं होतं.