जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सला सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून हातचा सामना गमवावा लागला. 185 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने फक्त एका फलंदाजांच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्यांचे 70 धावांमध्ये त्यांनी तब्बल आठ फलंदाज गमावले. पण या सामन्याचा जो बटरलची विकेट टर्निंग पॉईंट ठरली. राजस्थानने बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर राजस्थानचा डोलारा कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि पराभव ओढवून घेतला.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी सलामी दिली होती. रहाणे बाद झाल्यावरही बटलरने पंजाबच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला. बटलर धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण त्याला पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने ज्याप्रकारे आऊट केले, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच बटलरने क्रीझ सोडले होते. हे अश्विनच्या लक्षात आले आणि त्याने चेंडू न टाकता बटलरला रनआऊट केले. यावेळी बटलर आणि अश्विन यांच्यामध्ये वाद झाला. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सुपूर्द केले. तिसऱ्या पंचांनी यावेळी बटलर बाद झाल्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर सामना पंजाबच्या बाजूने फिरला.
अश्विनच्या या कृतीची माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निंदा करत आहेत. असे बाद करणे नियमात बसत असले तरी ही खिलाडू वृत्ती नाही असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. पण काही खेळाडू असेही आहेत की ज्यांनी अश्विनची बाजू उचलून धरली.
सलामीवीर ख्रिस गेलच्या भन्नाट खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने 185 धावांचे आव्हान उभे केले. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी आपला सलामीवीर लोकेश राहुल हा चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर गेलची वादळी खेळी पाहायला मिळाली. गेलने 47 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची भन्नाट खेळी साकारली.