चेन्नई : ‘प्ले ऑफ’साठी आवश्यक १६ गुणांची कमाई केल्यानंतरही चेन्नई सुपरकिंग्स शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या लढतीत वर्चस्वपूर्ण विजय मिळवून स्वत:चे अव्वल स्थान अबाधित राखण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. तीन वेळा जेतेपद पटकावलेल्या या दोन चॅम्पियन संघातील हा सामना चुरशीचा होईल, यात शंका नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने दोन पराभवानंतर पुन्हा विजयपथावर वाटचाल केली. शेन वॉटसनच्या आक्रमक खेळीच्या बळावर त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला.
मुंबई १० सामन्यात १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतर येथे दाखल झालेल्या मुंबईकर विजयाच्या प्रयत्नात असतील. चेन्नईने वॉटसनच्या खेळीचे स्वागत केले. पण सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्याकडून अधिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
विश्वचषकाआधी केदार जाधवला सूर गवसणे आवश्यक आहे. घरच्या मैदानावर गोलंदाजांनी चेन्नईचे विजय अधिक सोपे केले. दीपक चहर सुरुवातीच्या तसेच डेथ ओव्हरमध्ये धोकादायक वाटतो, तर आतापर्यंत १६ गडी बाद करणारा फिरकीपटू इम्रान ताहिरसह रवींद्र जडेजा आणि हरभजनसिंग हे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. (वृत्तसंस्था)
मुंबईचा यंदाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. त्यामुळे साखळी लढतीत अखेरच्या काही सामन्यात या संघाकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात या संघाची खरी ताकद फलंदाजीमध्ये आहे.
पोलार्ड, डिकॉक, हार्दिक व कृणाल हे पांड्या बंधू यांच्यावर धावा काढण्याची, तसेच बुमराह अॅण्ड कंपनीवर टिच्चून मारा करण्याची जबाबदारी असेल.
आतापर्यंत अपेक्षित खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माकडून दमदार खेळीची आशा आहे.