कोलकाता - कर्णधाराची एक किरकोळ चूक संघाला किती महाग पडू शकते याचा प्रत्यय आयपीएलमध्ये बुधवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या लढतीत आला. या लढतीत पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने क्षेत्ररक्षणात केलेल्या एका चुकीमुळे कोलकात्याचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याला जीवदान मिळाले. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत रसेलने पंजाबच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली आणि कोलकात्याला घरच्या मैदानात मोठी धावसंख्या उभारून दिली.
त्याचे झाले असे की, कोलकात्याविरुद्धच्या लढतीत पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर 16.5 षटकांपर्यंत कोलकात्याची 3 बाद 161 अशी अवस्था झाली होती. याच षटकातील शेवटच्या चेंडून मोहम्मद शमीने भन्नाट यॉर्करवर रसेलचा त्रिफळा उडवला. पंजाबच्या गोटात जल्लोष सुरू झाला. मात्र त्याचवेळी पंचांनी हा चेंडू नोबॉल असल्याचे जाहीर करत कोलकात्याला फ्री हिट बहाल केली. क्षणभर काय झाले हे कुणालाही कळेना. मग 30 यार्डच्या वर्तुळात चार क्षेत्ररक्षकांऐवजी केवळ तीनच क्षेत्ररक्षक असल्याने चेंडू नोबॉल ठरवल्याचे पंचांनी स्पष्ट केले.
राजस्थानविरुद्धच्या लढतीत नियमांचा फायदा उठवत बटलरला धावबाद करणाऱ्या अश्विनला बुधवारी क्षेत्ररक्षणातील एका नियमाचा विसर पडला. त्याच्याकडून क्षेत्ररक्षण लावताना झालेली ही छोटीशी चूक पंजाबला फारच महागात पडली. मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवताना आंद्रे रसेलने पुढच्या तीन षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत संघाला दोनशेपार पोहोचवले. त्याने अवघ्या 17 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 48 धावा कुटल्या. अखेर या आव्हानाचा पाठलाग करताना पंचाबचा डाव सुरुवातीपासूनच कोलमडला. शेवटी निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 190 धावांपर्यंतच मजला मारता आल्याने पंजाबला 28 धावांनी पराभव पत्करावा लागला.