Join us  

IPL 2018 : अखेरच्या चेंडूपर्यंत मुंबई लढली, पण हरली

अखेरच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी हैदराबादच्या बिली स्टॅनलेकने जोरदार फटका खेचत दोन धावांची वसूली केली आणि हैदराबादच्या परड्यात विजयाचे दान पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:00 AM

Open in App
ठळक मुद्देहैदराबाद अडचणीत सापडेल, असे वाटत होते. पण दीपक हुडाने चांगली फलंदाजी केली. हुडाने 25 चेंडूंत एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 32 धावांची खेळी साकारली व तोच हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

हैदराबाद : आयपीएलच्या गुरुवारी झालेल्या रोमहर्षक झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढला, पण त्यांना अखेर पराभवच स्वीकारावा लागला. सनराझर्स हैदराबादच्या संघाने फक्त एक विकेट राखून हा सामना जिंकला. फलंदाजांनी केलेल्या कुचकामी कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 148 धावांचे माफक लक्ष्य हैदराबादपुढे ठेवले होते. पण मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांवर वचक ठेवला होता. दीपक हुडाने यावेळी दमदार फलंदाजी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवले. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी हैदराबादच्या बिली स्टॅनलेकने जोरदार फटका खेचत दोन धावांची वसूली केली आणि हैदराबादच्या परड्यात विजयाचे दान पडले.

मुंबईच्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादने संयत सुरुवात केली. सलामीवीर वृद्धिमान साहाला (22) यावेळी मुंबईने दोनदा जीवदान दिले, पण त्याचा फायदा साहाला उठवता आला नाही. मयांक मार्कंडेने पायचीत पकडत साहाला तंबूचा रस्ता दाखवला. पण दुसरा सलामीवीर शिखर धवन चांगली फटकेबाजी करत होता. पहिल्या सामन्यासारखी तो मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण मार्कंडेनेच त्याला जसप्रीत बुमराकरवी झेलबाद केले. धवनने 28 चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर 45 धावांची खेळी साकारली. मार्कंडेने यावेळी हैदराबादच्या चार फलंदाज बाद केले आणि सामना मुंबईच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईची धावसंख्या यावेळी तोकडी पडली. त्यावेळी हैदराबाद अडचणीत सापडेल, असे वाटत होते. पण दीपक हुडाने चांगली फलंदाजी केली. हुडाने 25 चेंडूंत एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 32 धावांची खेळी साकारली व तोच हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

त्यापूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पहिल्याच षटकात दीपक हुडाने झेल सोडत जीवदान दिले. त्यानंतर रोहितने दोन चौकारही लगावले. पण या जीवदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित 11 धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या इशान किशनने (9)पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत झोकात सुरुवात केली. त्यानंतर आठ धावांवर असतानाहा त्यालाही जीवदान मिळाले, पण या जीवदानाचा फायदा त्यालाही उचलता आला नाही. किशन बाद झाला तेव्हा मुंबईचे सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या (15) या दोघांनी आपले खातेही उघडले नव्हते. शकिब अल हसनच्या नवव्या षटकात पंड्याने सलग दोन चौकार लगावले. पण या षटकाच्याच पाचव्या चेंडूवर शकिबने कर्णधार केन विल्यम्सनकरवी पंड्याला तंबूचा रस्ता दाखवला.

सूर्यकुमार आणि कायरन पोलार्ड हे दोघेही धडाकेबाज फलंदाज असले, तरी त्यांनी काही काळ आपल्या फटक्यांना मुरड घातली. त्यामुळे 13व्या षटकापर्यंत मुंबईची 4 बाद 90 अशी स्थिती होती. पण त्यानंतर मात्र पोलार्डने आपल्या पोतडीतील फटके बाहेर काढले. शकिबच्या 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. त्यानंतर पंधराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने जो सरळ रेषेत षटकार लगावला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. पण त्याची ही खेळी जास्त रंगली नाही. पंधराच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने चुकीचा फटका खेळला आणि त्याला तंबूची वाट धरावी लागली. पोलार्डने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 28 धावा केल्या.

आपल्या शंभराव्या सामन्यात सूर्यकुमार यादवला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईच्या 16 षटकांनंतर सूर्यकुमारने 25 चेंडूंत 21 धावाच केल्या होत्या. त्यानंतरही सूर्यकुमारही तळपला नाही. आपल्या या महत्वाच्या सामन्यात सूर्यकुमारला 31 चेंडूंत 28 धावाच करता आल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 147 धावांवरच समाधान मानावे लागले. 

टॅग्स :आयपीएल 2018सनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्स