India Tour of England : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान शर्मा, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय टीम इंडिया आज पहिल्या सराव सामन्यात मैदानावर उतरली. कौंटी एकादश संघाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. रोहितनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् लोकेश राहुलनं दमदार खेळ करताना तो निर्णय सार्थ ठरवला. वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान ही दोघं कौंटी एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसले. लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला सावरले.
काही दिवसांपूर्वी १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन झाले आणि त्यांना आदरांजली म्हणून टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले. मयांक अग्रवाल व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. लिंडन जेम्सनं या दोघांनाही स्वस्तात माघारी पाठवले. रोहित शर्मा ३३ चेंडूंत ९ धावांवर आणि मयांक अग्रवाल ३५ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी ही जोडी टीम इंडियाला सावरेल असे वाटत असताना पुजारा २१ धावांवर यष्टिचीत होऊन बाद झाला. विहारीनेही २४ धावांवर विकेट टाकली.
पण, लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेश १५० चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावांवर रिटायर्ड झाला. भारतानं ४ बाद १०७ वरून २३४ धावांपर्यंत मजल मारली आहे. जडेजा व शार्दूल ठाकूर मैदानावर आहेत. अन्य फलंदाजांना संधी मिळावी म्हणून लोकेश रिटायर्ड झाला.
विराट, अजिंक्य हे का नाही खेळले?
बीसीसीआयच्या वैद्यकिय टीममधून मिळालेल्या वृत्तानुसार भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या पाठीत मंगळवारी दुखू लागले आणि त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पहिल्या सराव सामन्यात खेळला नाही. ( Captain Virat Kohli felt some stiffness in his back on late Monday evening and he has been advised rest from the three-day first-class warm-up game by the BCCI Medical Team.) अजिंक्य रहाणेलाही हॅमस्ट्रींग दुखापत झाली आहे आणि त्याल इंजेक्शन घ्यावे लागले आहेत. त्यामुळे तोही सराव सामन्यासाठी उपलब्ध नाही. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. पहिल्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल.