डुब्लिन : दमदार सलामी आणि अचूक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने आपल्या शतकमहोत्सवी सामन्यात आयर्लंडवर 76 धावांनी विजय मिळवला.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 160 धावांची दमदार सलामी दिली. धवनने 45 चेंडूंत प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांच्या जोरावर 74 धावांची खेळी साकारली. धवन बाद झाल्यावर रोहितने अखेरच्या षटकापर्यंत किल्ला लढवला, पण त्याचे शतक यावेळी तीन धावांनी हुकले. रोहितने 61 चेंडूंत 8 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 97 धावा फटकावल्या. या दोघांच्या खेळींमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 208 धावा करता आल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या जेम्स शेनॉनने 60 धावांची दमदार खेळी साकारली, पण अन्य फलंदाजांना त्याला चांगली साथ देता आली नाही. कुलदीप यादवने चार आणि युजवेंद्र चहलने तीन फलंदाजांना बाद केल्यामुळे आयर्लंडचा डाव 132 धावांवर संपुष्टात आला.