कोलंबो : हा नवा भारत आहे... तुम्ही प्रतिस्पर्धी नव्हे, तुम्ही फक्त पराभवस्पर्धी आहात... हेच भारताने पाकिस्तानच्या बाबतीत पुन्हा सिद्ध केले. टी-२० विश्वचषकमध्ये कोलंबोमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आधी भारतीय फलंदाजांनी धू-धू धुतले अन् नंतर गोलंदाजांनी पाकचे एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत धाडले... अन् ईशान किशनच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकवर 'ई'शानदार विजय मिळविला. भारताच्या १७५ धावांचा पाठलाग करताना पाकचा ११४ धावांवर चुराडा झाला.
आतापर्यंतच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये ९ पैकी ८ वेळा टीम इंडियाचाच विजय झाला असून, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही १७ पैकी १४ सामने भारताने जिंकले आहेत.
टॉस जिंकल्यानंतर पाकने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ६ फिरकीपटू उतरवले. या जाळ्यात भारत अडकला नाही. उलट, भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच खणखणीत धावा करणे सुरू ठेवले. ईशानची स्फोटक अर्धशतकी खेळी, सूर्यकुमार, शिवम दुबेची धाकड फलंदाजी या जोरावर भारताने १७५ धावा केल्या. ११४ धावांतच पाक गारद झाला.
कोण ठरले सामन्याचे हीरो..?
१. ईशान किशन : ७७ धावांची खेळी, कीपिंगही चांगली.
२. सूर्यकुमार यादव : फलंदाज अन् कर्णधार म्हणूनही उत्तम.
३. जसप्रीत बुमराह : सुरुवातीलाच दोघांचे बळी घेतले.
४. अक्षर पटेल : दोघांचे बळी घेत पाकला खिंडार पाडले.
या सामन्यातून काय शिकावं?
परस्थिती कशीही असो, चांगल्या गोष्टी करण्याचे सातत्य राखावे. भारतीय फलंदाजांनी अन् गोलंदाजांनीही तेच सातत्य राखले. पाकिस्तानला हेच सातत्य राखता आले नाही.
हात मिळवणं तर लांबच, सूर्यकुमारने पाक कर्णधाराकडे ढुंकूनही पाहिलं नाही!
खेळाच्या मैदानात चेंडू पडण्याआधीच टॉसच्या वेळी मोठी घटना घडली. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली 'नो हॅन्डशेक पॉलिसी' कायम ठेवत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हात मिळवण्यास नकार दिला. टॉसच्या वेळी सूर्यकुमारने पाकिस्तानी कर्णधाराकडे साधे पाहिलेही नाही, ज्यामुळे क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.