ब्लोमफोंटेन : विश्वविजेतेपद राखण्याच्या दृष्टीने शानदार सुरुवात करणारा भारतीय संघ आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकात मंगळवारी दुबळ्या जपानविरुद्ध आपल्या दुसऱ्या सामन्यात मोठा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
भारताने प्रभावी फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर रविवारी अ गटातील आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर ९० धावांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना पावसामुळे होऊ न शकल्याने जपानला एक गुण मिळाला. भारत २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे.
भारताने रविवारी श्रीलंकेला सहज नमवले. भारताने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर यशस्वी जायस्वाल (५९), कर्णधार प्रियम गर्ग (५६), उपकर्णधार ध्रुव जुरेल (५२) यांच्या जोरावर ४ बाद २९७ धावा केल्या व लंकेला ४५.२ षटकांत २०७ धावांत गुंडाळले. भारताकडून सिद्धेश वीरने ३४ धावांत २ गडी बाद केले.
जपानकडून भारतीय संघाला आव्हान मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. जर भारताने प्रथम फलंदाजी केल्यास ते मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील.