अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा पहिला कसोटी सामना आज अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील हा पहिला सामना आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. या कसोटी मालिकेत विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिषभ पंत आदी सात भारतीय खेळाडूंना इतिहास घडवण्याची संधी आहे.
विराट कोहलीला सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची संधी आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने आतापर्यंत 46 कसोटीपैकी 26 सामने जिंकले आहेत. त्याला महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक 27 कसोटी विजयाचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.
भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2016मध्ये 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. पण, वेस्ट इंडिजमध्ये याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो यशस्वी झाल्यास तो इतिहास घडवू शकतो. वेस्ट इंडिजमध्ये 2-0 अशा फरकाने मालिका जिंकणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरेल.
रवीचंद्रन अश्विनलाही एक विक्रम खुणावत आहे. अश्विनने 65 कसोटीत 342 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याला 350 विकेटसाठी केवळ 8 विकेट्स हव्या आहेत. या मालिकेत आठ विकेट घेतल्यास तो अनील कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांच्या पंक्तित बसेल. 350 विकेट्स घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरेल.
नरेंद्र हिरवानी यांच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल. भारतासाठी सर्वात जलद 50 विकेट्स या आर अश्विनने ( 9 सामने) घेतल्या आहेत.