Join us  

India vs South Africa, 3rd Test : निकृष्ट हॉटेल्स अन् भारतीय जेवण, याचा कामगिरीवर परिणाम; आफ्रिकन खेळाडूचा अजब तर्क

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना आज रांची येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 8:55 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना आज रांची येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आफ्रिकेसाठी तिसरा सामना हा इभ्रत वाचवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. एडन मार्करामनं माघार घेतल्यानंतर या सामन्यात आफ्रिकेच्या डीन एल्गरवर भिस्त असणार आहे. पण, सामन्यापूर्वी एल्गर वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. भारतात मिळत असलेल्या आदरातिथ्यावर एल्गरने भाष्य करताना त्यामुळेच खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचा अप्रत्यक्ष दावा केला.

आशियाई उपखंडातील खेळणं हे नेहमी आव्हानात्मकच असेत, असे सांगताना त्यानं येथील हॉटेलच्या निकृष्ट दर्जावर टीका केली. शिवाय भारतीय जेवणामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेण्यास अडचण झाली, असेही तो म्हणाला. ''हा आव्हानात्मक दौरा होता. व्यक्ती म्हणून आणि खेळाडू म्हणूनही खूप थकवणारा दौरा ठरला. येथील हॉटेल्स लहान होती, त्यांचा दर्जाही तितकासा चांगला नव्हता. तसेच जेवणंही मनासारखं नव्हतं,'' असे एल्गरने सांगितले.

क्लीन स्वीपसह ४० गुण मिळविण्याचा भारताचा निर्धाररांची : मालिका आधीच खिशात घालणारा भारतीय संघ शनिवारपासून द.आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसºया आणि अंतिम कसोटीत विजय मिळवून ‘क्लीन स्वीप’च्या तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील महत्त्वपूर्ण गुण संपादन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. हा सामना औपचारिक वाटत असला तरी विजयामुळे भारतीय संघ ४० गुणांची कमाई करेल. पहिल्या दोन्ही सामन्यात प्रत्येक क्षेत्रात भारताने वर्चस्व गाजवले होते.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचे चार सामन्यातून २०० गुण, तर न्यूझीलंड व श्रीलंका यांचे प्रत्येकी १४० गुण आहेत. भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत कुठलीही उणीव जाणवत नाही. रोहित शर्मा याने सलामीवीर म्हणून चोख भूमिका बजावली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात त्याने शतके ठोकली होती. मयांक अगरवाल याने विशाखापट्टणमला द्विशतक, तर पुण्यात शतक ठोकले. कोहलीनेही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करीत २५४ धावा ठोकल्या होत्या. मालिकेत दोन अर्धशतकांची नोंद करणारा चेतेश्वर पुजारा याला येथे मोठी खेळी करण्याची संधी असेल. 

प्रतिस्पर्धी संघ :भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन,रवींद्र जडेजा, शाहबाद नदीम. मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि शुभमन गिल. 

दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बावुमा (उप कर्णधार), थेनिस डी ब्रुइ, क्वींटन डिकॉक, डीन एल्गर, झुबेर हमजा, जॉर्ज लिंडे, सेनुरन मुथुस्वामी, लुंगी एनगिडी, एरिक नॉर्टजे, व्हर्नोन फिलॅॅन्डर, डेन पीट, कासिगो रबाडा आणि रूडी सेकंड.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत