Join us

India vs South Africa, 2nd T20 : दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात पाऊस कधी पडणार, जाणून घ्या...

दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 18:07 IST

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

 दोन्ही संघ या सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत.

मोहाली येथील सामना सुरु झाल्यावर अर्ध्या किंवा एका तासाने पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासानंतर पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता पाऊस बाजी मारणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. धर्मशाला येथील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मोहालीमध्ये मात्र पावासाचे वातावरण नाही. मोहालीमध्ये सध्याच्या घडीला 28 ते 31 डिग्री एवढे तापमान आहे.

या सामन्यापासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात विक्रमासाठी चढाओढ सुरू होणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहलीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. रोहित 53 धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीला या विक्रमात रोहितला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितनं 88 डावांत 2422 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावे 65 डावांत 2369 धावा आहेत. दुसरीकडे रोहितला कोहलीच्या एका विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या विक्रमात कोहली 21 अर्धशतकांसह आघाडीवर आहे. रोहितच्या नावावर 17 अर्धशतकं आणि चार शतकं आहेत. या विक्रमांसह आजच्या लढतीत मालिकेत कोण आघाडी घेतं, याचीही उत्सुकता आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका