IND vs PAK, T20 World Cup 2026: १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील का? २०२६च्या टी२० विश्वचषक सामन्यासाठी ते आमनेसामने येतील का? असे प्रश्न सगळ्यांनाच पडले आहेत. या प्रश्नांची आता हळूहळू उत्तरे मिळतील अशी आशा आहे. पाकिस्तानी मीडिया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणं शक्य असल्याचे वृत्त देताना दिसू लागले आहेत. याचाच अर्थ क्रिकेटमधील हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत एकमेकांसमोर येऊ शकतात. एका पाकिस्तानी पत्रकाराने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबद्दलची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तानी पत्रकार म्हणाला...
पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, "महत्त्वाचे!! पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध टी२० विश्वचषक स्पर्धेतील १५ फेब्रुवारीचा श्रीलंकेतील सामना खेळण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान सरकारमधील दोन बड्या अधिकाऱ्यांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. क्रिकेटरसिकांनो, मोठ्या सामन्यासाठी तयार राहा." याचाच अर्थ पाकिस्तान सरकारमध्ये भारताविरूद्धचा सामना खेळण्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. सामना न खेळल्यास परिणामांना तयार राहा, असा सज्जड दम आयसीसीने पाक बोर्डाला भरला होता. त्यानंतर आता हळूहळू पाकिस्तानचा विरोध मावळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
येत्या २४ तासांत मोठी घोषणा
यापूर्वी, ८ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये आयसीसी प्रतिनिधी आणि पीसीबी यांच्यात चर्चा झाली होती, ज्यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. जिओ सुपरने अंतर्गत सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले की आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यातील बैठक सुमारे पाच तास चालली आणि त्यात एका निष्कर्षावर पोहोचली. पुढील २४ तासांत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
पाक पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर नक्वी करू शकतात घोषणा
या बैठकीनंतर पाकिस्तानकडून यू-टर्न घेण्याची अपेक्षा आहे. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी बोलल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी भारतासोबत सामना खेळण्यास हिरवा कंदील देऊ शकतात, असे म्हटले जात आहे.