भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी कोलंबोमध्ये राजकीय आणि क्रीडा वातावरण चांगलेच तापले आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या पाकिस्तानविरुद्धच्या 'नो हॅन्डशेक' धोरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या धोरणावर कडाडून टीका करत याला 'मूर्खपणा' म्हटले आहे.
मांजरेकर यांनी आपल्या 'एक्स' (ट्विटर) अकाऊंटवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "भारताने हस्तांदोलन न करण्याचे जे काही सुरू केले आहे, ते अत्यंत मूर्खपणाचे आहेत. आपल्यासारख्या महान देशाला हे शोभत नाही. एक तर खेळाच्या भावनेनुसार योग्य पद्धतीने खेळा किंवा मग अजिबात खेळू नका." जर दोन्ही देश मैदानावर एकमेकांसमोर उभे राहत असतील, तर खेळाच्या मूलभूत परंपरांचे पालन झालेच पाहिजे, असे मांजरेकर यांचे स्पष्ट मत आहे.
'नो हॅन्डशेक' धोरणामागचे कारण काय?
भारतीय पुरुष आणि महिला संघाने गेल्या काही काळापासून पाकिस्तानविरुद्ध हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाने 'ऑपरेशन सिंदूर' चालवले होते. या घटनेनंतर देशातील जनभावना लक्षात घेऊन आशिया चषक २०२५ पासून भारताने पाकिस्तानसोबत केवळ क्रिकेट खेळायचे, मात्र सामोपचाराचे कोणतेही प्रदर्शन (हस्तांदोलन) करायचे नाही, असा पवित्रा घेतला आहे.
कर्णधारांची भूमिका काय?
या वादावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने अत्यंत मुत्सद्दी उत्तर दिले. "पुढील २४ तास प्रतीक्षा करा. आम्ही येथे क्रिकेट खेळायला आलो आहोत," असे म्हणत त्याने या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने म्हटले की, "क्रिकेट नेहमीच खिलाडूवृत्तीने खेळले पाहिजे. निर्णय त्यांच्या हातात आहे, पण आमची टीम हस्तांदोलनासाठी तयार आहे."
मैदानाबाहेरही रंगणार सामना
२०२५ च्या आशिया चषकात जेव्हा सूर्याने हस्तांदोलनास नकार दिला होता, तेव्हा पाकिस्तानने बहिष्काराची धमकी दिली होती. आता कोलंबोमधील आजच्या सामन्यात खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात की 'नो हॅन्डशेक' धोरण कायम राहते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.