India vs Pakistan, ICC Women's World Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी सोहळाच.. मग तो सामना पुरुष क्रिकेटपटूंचा असो किंवा महिलांचा... यूएईत बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच भारतीय संघावर विजय मिळवला. त्यानंतर आज भारतीय महिला व पाकिस्तानी महिला यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना सुरू आहे. मिताली राजच्या ( Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पाकिस्तानला कडवी टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण, आजच्या सामन्यात चित्र काही वेगळेच दिसले. स्मृती मानधना ( Smriti Mandhana) व दीप्ती शर्मा यांनी आधार देऊनही भारताचे ५ खेळाडू अवघ्या १८ धावांत माघारी पाठवून पाकिस्तानने सामन्यात कमबॅक केले आहे.
महिला वर्ल्ड कप स्पर्धत Ind Women vs Pak Women यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले आणि तिनही भारताने जिंकले. २००९मध्ये भारताने १० विकेट्सने, २०१३ मध्ये ६ विकेट्सने आणि २०१७मध्ये ९५ धावांनी विजय मिळवला होता. आजही विजयाची अपेक्षा आहे. स्मृती मानधना व शेफाली वर्मा सलामीला आले, परंतु तिसऱ्याच षटकात डाएना बैगने भारताला पहिला धक्का दिला. वर्मा भोपळ्यावर बाद झाल्यानंतर मानधना व दीप्तीने ( Deepti Sharma) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नर्शा संधूने ही जोडी तोडताना दीप्तीला ४० धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर स्मृती ७५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाली. अमन आमीनने स्वतःच्याच गोलंदाजीवर स्मृतीचा झेल घेतला.
यानंतर भारताच्या तीन विकेट पटापट पडला. १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली. हरमनप्रीत कौर ( ५), कर्णधार मिताली ( ९) व रिचा घोष ( १) यांचे अपयश भारताला महागात पडताना दिसतेय.