हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : सुरूवातीचे तीनही सामने खिशात घातल्याने बिनधास्त झालेल्या भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले. भारताचा निम्मा संघ त्यांनी अवघ्या 33 धावांवर माघारी पाठवला. जगातील सर्वात सक्षम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघावर चौथ्या सामन्यात नाचक्की ओढावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताच्या सलामीच्या पाच फलंदाजांपैकी शिखर धवनच्या 13 धावा या सर्वोत्तम ठरल्या. 2005 नंतर भारतीय संघावर प्रथमच भारतीय संघावर अशी नामुष्की ओढावली आहे.
नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियम्सनने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. 200 वा वन डे सामना खेळणाऱ्या रोहितकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, त्यावर तो खरा उतरला नाही. ट्रेंट बोल्टने सलामीवीर
शिखर धवनला ( 13) माघारी पाठवले आणि भारतीय संघाची पडझड सुरू झाली. रोहितही ( 7) बोल्टच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ट झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा शुबमन गिल ( 9) फार काही चमक दाखवू शकला नाही. अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांना मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु ते भोपळाही न फोडता ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर तंबूत परतले. पहिले पाच फलंदाज 33 धावांवर माघारी परतले. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सामन्यात पहिले पाच फलंदाज 33 धावांवर बाद होण्याची ही नीचांक खेळी ठरली. यापूर्वी 2005 मध्ये बुलावायो येथे न्यूझीलंडने 34 धावांवर भारताच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले होते.
भारताचे 6 फलंदाज 35 धावांवर बाद झाले. ही दुसरी नीचांक खेळी आहे. याआधी 2017 मध्ये धरमशाला येथे श्रीलंकेविरुद्ध भारताचे सहा फलंदाज अवघ्या 28 धावांवर तंबूत गेले होते.