India vs England, 2nd Test: Lord’s weather report - भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीचा खेळ पावसाने वाया घालवला अन् टीम इंडियाची विजयाची संधी हुकली. भारतीय संघानं पहिल्याच कसोटीत दमदार कामगिरी करताना पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या दिशेनं पाऊल टाकलंच होतं, परंतु पावसानं विराट कोहली अँड कंपनीची वाट अडवली. पाचव्या दिवशी १५७ धावा करण्यासाठी सज्ज असलेल्या टीम इंडियाला पावसानं मैदानावर उतरूच दिले नाही. कर्णधार विराट कोहलीनंही नाराजी व्यक्त केली, परंतु निसर्गासमोर तोही हतबल होताच. आता गुरुवारपासून दुसऱ्या कसोटीला लॉर्ड्सवर सुरुवात होत आहे आणि तेथील हवामान काय सांगतंय ते जाणून घेऊया...
India vs England playing XI: लॉर्ड्स कसोटीपूर्वी दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण; टीम इंडियाला बसलाय मोठा धक्का!
metoffice.gov.ukच्या माहितीनुसार दुसऱ्या कसोटीच्या दृष्टीनं आनंदाची बातमी आहे. पाचही दिवस सूर्यदेवाची कृपा राहणार आहे. चौथ्या दिवशी रिमझिम पावसाची शक्यता वगळल्यास कसोटीत फार व्यत्यय येणार नाही. त्यामुळे जलदगती गोलंदाजांना भरपूर मदत मिळणार हे निश्चित आहे. पण, लंडनमधील हवामान २४ तासांत बदलतं त्यामुळे आता जरी पाऊस नाही, असे दिसत असले तरी हे चित्र कधी बदलेल याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. त्यामुळे दोन्ही संघांनी फिंगर क्रॉस केले आहेत. चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात १५ मिनिटांसाठी पाऊस पडेल असा अंदाज आहे.
![]()
भारतीय संघानं लॉर्ड्सवर १८ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी फक्त दोनदाच विजय मिळवता आलेला आहे. २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघानं यजमानांना ९५ धावांनी पराभूत केले होते, तर १९८६मध्ये कपिल देव यांच्य नेतृत्वाखाली भारतानं लॉर्ड्सवर पहिला कसोटी विजय मिळवला होता.