हुश्श! जिंकलो रे...; भारताने साधली बरोबरी; इंग्लंडचा ८ धावांनी पराभव

१८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. अखेरच्या षटकात २२ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरच्या सुमार माऱ्याचा इंग्लंडने फायदा घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 03:06 AM2021-03-19T03:06:37+5:302021-03-19T06:43:01+5:30

whatsapp join usJoin us
India equalized England lost by 8 runs | हुश्श! जिंकलो रे...; भारताने साधली बरोबरी; इंग्लंडचा ८ धावांनी पराभव

हुश्श! जिंकलो रे...; भारताने साधली बरोबरी; इंग्लंडचा ८ धावांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी अत्यंत रोमांचक सामन्यात भारतानेइंग्लंडवर ८ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना शनिवारी रंगेल. सूर्यकुमार यादवचे तडाखेबंद अर्धशतक मोलाचे ठरले.

१८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. अखेरच्या षटकात २२ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरच्या सुमार माऱ्याचा इंग्लंडने फायदा घेतला. जोफ्रा आर्चरने एक चौकार व एक षटकार ठोकाल, शिवाय शार्दुलने दोन वाईड चेंडू टाकत भारताला दडपणात आणले. मात्र, पाचव्या चेंडूवर आर्चरला बाद करुन शार्दुलने मोलाची कामगिरी केली आणि भारताचा विजय निश्चित झाला. पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजी करत भारताने ८ बाद १८५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंडने झुंजार खेळ केला, मात्र मोक्याच्यावेळी प्रमुख फलंदाज बाद झाल्याने दडपणाखाली त्यांचा डाव २० षटकांत ८ बाद १७७ धावा असा घसरला. शार्दुलने १७व्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर बेन स्टोक्स व इयॉन मॉर्गन यांना बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर नेले. शार्दुलने ३, तर हार्दिक व राहुल चहरने २ बळी घेत चांगला मारा केला.

त्याआधी, सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतरही सलामीवीर लोकेश राहुलला पुन्हा संधी मिळाली. मात्र, तरीही त्याला छाप पाडता आली नाही. दुसरीकडे, पुन्हा एकदा दमदार सुरुवातीनंतरही रोहित शर्मा मोठी खेळी करु शकला नाही. डावाची सुरुवात षटकार ठोकून केल्यानंतर पहिल्याच षटकात रोहितने १० धावा काढल्या. चौथ्या षटकात रोहित आर्चरचा बळी ठरला. सूर्यान् आंतरराष्ट्रीय डावाची सुरुवात षटकार ठोकून केली. सूर्या नैसर्गिक खेळी खेळत असताना राहुल (१४) अपयशी ठरला. सूर्याने ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. फाईन लेगला षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला. यानंतर, ॠषभ पंत (३०) व श्रेयस अय्यर (३७) यांनी भारताच्या धावगतीला वेग दिला. आर्चरने ३३ धावांत ४ बळी घेत भारताचे कंबरडे मोडले.

तिसऱ्या पंचाला 
झालं काय?
या सामन्यात तिसरे पंच विरेंदर शर्मा यांच्यावर बरीच टीका झाली. निर्णय देण्यात दोनदा चूक झाल्याने भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल घेतला. मात्र यावेळी चेंडू जमिनीला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसल्यानंतरही शर्मा यांनी सूर्याला बाद ठरविले. यानंतर २०व्या षटकात वॉशिंग्टर सुंदरने हवेत फटकावलेला चेंडू आदिल राशिदने झेलला खरा, परंतु यावेळी त्याच्या पाय सीमारेषेला लागत असल्याचे रिप्लेमध्ये दिसल्यानंतरही सुंदरला बाद ठरविण्यात आले. या दोन निर्णयानंतर सोशल मीडियावर तिसरे पंच शर्मा चांगलेच ट्रोल झाले. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवानेही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर टीका केली.

१७ वे षटक 
ठरले टर्निंग पॉइंट
शार्दुल ठाकूर टाकत असलेले १७ वे षटकत टर्निंग पॉइंट ठरले. या षटकामध्ये शार्दुलने फटकेबाजी करत असलेल्या बेन स्टोक्ससह धोकादायक इयॉन मॉर्गन यालाही बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. सलग दोन चेंडूंवर दोन महत्त्वपूर्ण बळी गेल्याने इंग्लंड संघ दडपणाखाली गेला. यावेळी इंग्लंडला विजयासाठी २२ चेंडूंत ४६ धावांची गरज होती.
चार मुंबईकर
चौथ्या टी-२० सामन्यात भारताच्या अंतिम संघात चार मुंबईकरांना संधी मिळाली. सलामीवीर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर असे चार मुंबईकर या सामन्यात खेळले. 

सूर्यकुमारची दणक्यात सुरुवात
-  मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने दिमाखात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांना सुरुवात केली. दुसऱ्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्याला त्यावेळी फलंदाजीची संधी मिळाली नाही. 
-  यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर बसावे लागले. चौथ्या सामन्यात मात्र संधी मिळताच त्याने दणका दिला. आंतरराष्ट्रीय डावाला सुरुवात करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने इंग्लंडला इशारा दिला. 
-  आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिलाच चेंडू खेळताना षटकार ठोकणारा सूर्या तिसरा फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी सोहेल तन्वीर (पाकिस्तान, २००७ भारताविरुद्ध) आणि मंगालिसो मोशेल (द. आफ्रिका, २०१७ श्रीलंकाविरुद्ध) यांनी केली आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
विराट कोहली ९,६५०
रोहित शर्मा ९,००१
सुरेश रैना ८,४९४
शिखर धवन ८,१०२
सर्वाधिक टी-२० षटकार (भारतीय)
रोहित शर्मा ५०
विराट कोहली ४८
युवराज सिंग ३२

‘हिटमॅन’
पहिलाच भारतीय
रोहित शर्माने दिमाखात सामन्याची सुरुवात करताना डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय, तर एकूण सातवा क्रिकेटपटू ठरला. याआधी अशी कामगिरी कमरान अकमल (पाकिस्तान), करिम सादिक (अफगाणिस्तान), द्वेन स्मिथ (वेस्ट इंडिज), मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड), कॉलिन मुन्रो (न्यूझीलंड) आणि हझरतुल्लाह झझाई (अफगाणिस्तान) यांनी केली आहे. यापैकी द्वेन स्मिथने असा पराक्रम दोन वेळा केला आहे.

धावफलक :
भारत : रोहित शर्मा झे. व गो. आर्चर १२, लोकेश राहुल झे. आर्चर गो. स्टोक्स १४, सूर्यकुमार यादव झे. मलान गो. कुरेन ५७, विराट कोहली यष्टिचीत बटलर गो. राशिद १, ॠषभ पंत त्रि. गो. आर्चर ३०, श्रेयस अय्यर झे. मालन गो. आर्चर ३७, हार्दिक पांड्या झे. स्टोक्स गो. वूड ११, शार्दुल ठाकूर नाबाद १०, वॉशिंग्टन सुंदर झे. राशिद गो. आर्चर ४, भुवनेश्वर कुमार नाबाद ०. अवांतर - ९. एकूण : २० षटकांत ८ बाद १८५ धावा.
गोलंदाजी : आदिल राशिद ४-१-३९-१; जोफ्रा आर्चर ४-०-३३-४; मार्क वूड ४-१-२५-१; ख्रिस जॉर्डन ४-०-४१-०; बेन स्टोक्स ३-०-२६-१; सॅम कुरेन १-०-१६-१.

इंग्लंड : जेसन रॉय झेल सूर्यकुमार गो. हार्दिक ४०, जोस बटलर झे. राहुल गो. भुवनेश्वर १४, डेव्हिड मलान त्रि. गो. चहल १४, जॉनी बेयरस्टॉ झे. सुंदर गो. चहर २५, बेन स्टोक्स झे. सूर्यकुमार गो. शार्दुल ४६, इयॉन मॉर्गन झे. सुंदर गो. शार्दुल ३, सॅम कुरेन त्रि. गो. हार्दिक ३, ख्रिस जॉर्डन झे. हार्दिक गो. शार्दुल १२, जोफ्रा आर्चर नाबाद १८, आदिल राशिद नाबाद ०. अवांतर - ६. एकूण : २० षटकांत ८ बाद १७७ धावा
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-१-३०-१; हार्दिक पांड्या ४-०-१६-२; शार्दुल ठाकूर ४-०-४२-३; वॉशिंग्टन सुंदर ४-०-५२-०; राहुल चहर ४-०-३५-२.
 

Web Title: India equalized England lost by 8 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.