Anil Kumble Shubman Gill Team India Test Captaincy IND vs ENG: भारतीय संघाचे तीन दिग्गज रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांच्याशिवाय पहिल्यांदाच टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार आहे. २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर शुबमन गिलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संघात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असताना गिलकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. तशातच भारताचा दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळेने अतिशय रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
"भारताचे सर्वच खेळाडू चांगले आहेत. पण टीम इंडियाचे नेतृत्व करणे हे IPL टीम किंवा राज्यांच्या संघाच्या कॅप्टन्सीपेक्षा वेगळे असते. टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी अधिकारांसोबत काही जबाबदाऱ्याही येतात आणि तितकाच दबावही असतो. पण मला खात्री आहे की शुबमन गिल यातून नक्कीच मार्ग काढेल, कारण तो तितका सक्षम आहे," असा विश्वास अनिल कुंबळेने व्यक्त केला.
"रोहित, विराट, अश्विन हे भारतीय कसोटी संघाचे तीन खांब होते. त्यांच्याशिवाय क्रिकेट पाहणे सर्वांसाठी नवीन गोष्ट असणार आहे. पण कधी ना कधी हा बदल होणार होताच. ते संघात नसताना टीम मैदानात उतरेल तेव्हा चित्र खूपच वेगळं दिसेल. ड्रेसिंग रूममधले वातावरणही खूप वेगळे असेल. पण ही नव्या पिढीची सुरुवात आहे. तसेच WTC ची देखील ही नवी सुरुवात आहे. नव्या दमाचा संघ नक्कीच जिंकण्याच्या उद्देशाने उतरेल. शुबमन गिल नक्कीच त्याला मिळालेल्या अनुभवाचा फायदा करून घेईल आणि ड्रेसिंग रुमचं वातावरण उत्साही ठेवेल," असेही कुंबले म्हणाला.
Web Title: India captaincy different from IPL franchise but Shubman Gill will figure it out said Anil Kumble
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.