India vs West Indies 3rd ODI Live Updates : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गिलने सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिसऱ्या वन डे सामन्यात तर तो शतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु पावसाने घोळ घातला. ९८ धावांवर असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला आहे. आणखी काही काळ पाऊस असाच सुरू राहिला, तर भारताला ३ बाद २२५ धावांवरच डाव सोडावा लागेल. त्यामुळे गिलला ९८ धावांवरच समाधानी रहावे लागेल. वेस्ट इंडिजसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवले जाईल ते पाहूयात...
शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पावसामुळे हा सामना जवळपास तास-दीड तास थांबवण्यात आला. आशिया खंडाबाहेर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा करणाऱ्या विक्रमात धवनने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ( २९) विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात विराट कोहली ( ४९), सचिन तेंडुलकर ( ४८), राहुल द्रविड (४२), सौरव गांगुली ( ३८) व रोहित शर्मा ( ३६) हे आघाडीवर आहेत.
भारतीय वेळेनुसार ११.१५ वाजता पुन्हा सामना सुरू झाला आणि ४०-४० षटकांची सामना खेळवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या गिल व श्रेयस अय्यर यांनी पहिल्या दोन षटकांत ३१ धावा कुटल्या. हाताशी १६ षटकं असल्याने वेगाने धावा वाढवण्याचा या दोन्ही फलंदाजांना निर्धार दिसत होता. या दोघांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली, ३३व्या षटकात अकिल होसैनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ४४ ( ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. भारताकडून पहिल्या २७ वन डे नंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत श्रेयसने ( ११०८) तिसरे स्थान पटकावताना विराट कोहली ( १०५४) व लोकेश राहुल ( १०१६) यांना मागे टाकले. नवज्योत सिद्धू ( ११४०) व
शिखर धवन ( ११००) हे आघाडीवर आहेत.
त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव ( ८) वॉल्स ज्युनियरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. ९७ धावांवर असताना गिलसाठी विंडीजच्या खेळाडूंनी LBW ची जोरदार अपील केले आणि त्यासाठी DRS ही घेतले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. पण, पावसाने भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा वाढवली. प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या. ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद आहे.
पाऊस थांबल्यावर जर विंडीजला फलंदाजीला येण्यास सांगितले आणि षटकांची मर्यादा पुन्हा कमी केली, तर त्यांच्यासमोर किती धावांचे लक्ष्य असू शकतं?
३६ षटकांत २६३ धावा
३० षटकांत २३२ धावा
२५ षटकांत २०५ धावा
२० षटकांत १७५ धावा