India vs South Africa 4rth T20I Live Updates : दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) व हार्दिक पांड्या यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. दक्षिण आफ्रिकेवर दडपण निर्माण करण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवले आणि पाहुण्यांना विकेट फेकण्यास भाग पाडले. भारताने सलग दोन विजयांसह मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे आणि आता बंगळुरूत मालिकेचा निकाल लागणार आहे. आवेश खानने ४ विकेट्स घेऊन आज यशस्वी गोलंदाजाचा मान पटकावला. या सामन्यात ९ विकेट्स पडूनही आफ्रिकेने मैदान सोडले.
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना आफ्रिकेच्या धावांवर लगाम लावला होता. त्यात कर्णधार टेम्बा बवुमा याला दुखापतीमुले रिटायर्ड हर्ट होऊन माघारी जावे लागले. पाचव्या षटकात क्विंटन डी कॉक व ड्वेन प्रेटोरीयस यांच्यातला ताळमेळ चुकला अन् क्विंटनला १४ धावांवर रन आऊट होऊन माघारी जावं लागलं. त्यानंतर आवेश खानने आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना प्रेटोरीयसला भोपळ्यावर बाद केले.
९व्या षटकात युजवेंद्र चहलने भारताला आणखी एक यश मिळवून देताना हेनरिच क्लासेनला ( ८) LBW केले. त्यानंतर हर्षल पटेलने वेगवान चेंडू फेकून डेव्हिड मिलरचा ( ९) त्रिफळा उडवला. चेंडू आणि धावा यांच्यातील दरी वाढत असल्याने आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर फेकला जात होता. भारताच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( २०) आवेश खानने ऋतुराजकरवी झेलबाद केले. त्याच षटकात मार्को येनसेनलाही ( १२) आवेश-ऋतुराज जोडीने माघारी पाठवले. पुढच्या चेंडूवर आवेशने तिसरी विकेट घेतली आणि ७ बाद ७८ अशी आफ्रिकेची अवस्था केली. युजवेंद्र चहलने २१ धावांत २ विकेट्स घेतल्या. आवेशने १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने ९वी विकेट घेत आफ्रिकेचा डाव ८७ धावांत गुंडाळला. भारताने हा सामना ८३ धावांनी जिंकला. टेब्मा बवुमा रिटायर्ड हर्ट झाल्याने आफ्रिकेला 16.5 षटकांत 9 बाद 87 धावांवर मैदाना सोडावे लागले.
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड ( ५), श्रेयस अय्यर ( ४) व इशान किशन ( २७ ) हे फलकावर ४० धावांवर माघारी परतले. हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी सावध सुरुवात केली, परंतु त्यांनी ४१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सेट केला. रिषभला ( १७) मोठी खेळी करण्यात आजही अपयश आले. हार्दिक व दिनेश कार्तिक ३३ चेंडूंत ६५ धावा जोडताना भारताला समाधानकारक पल्ला उभारून दिला. हार्दिक ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. दिनेश २७ चेंडूंत ९ चौकार व २ षटक खेचून ५५ धावांवर माघारी परतला. भारताने ६ बाद १६९ धावा केल्या. यापैकी ७३ धावा या अखेरच्या ५ षटकांत आल्या.