IND vs SA 2nd Test Live Updates Marathi (Marathi News) : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगला खेळ करून सावरलेला डाव नांद्रे बर्गरने मोडला. त्यानंतर लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांच्या ११ चेंडूंत भारताने ६ विकेट्स गमावल्या आणि मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली. विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला. भारताने शून्य धावेवर या ६ विकेट्स गमावल्या आणि ही पडझड पाहून सारेच शॉक्ड झाले. अनुष्का शर्मा व अथिया शेट्टीही अवाक् झालेले दिसले.
सामन्याला खरी कलाटणी ३४व्या षटकात मिळाली. लुंगी एनगिडीने एकाच षटकात लोकेश राहुल (८), रवींद्र जडेजा ( ०) व जसप्रीत बुमराह ( ०) यांना माघारी पाठवले. पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने विराटची ( ४६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज रन आऊट झाला आणि प्रसिद्ध कृष्णा ( ०) झेल देऊन माघारी परतला. आफ्रिकेने भारताचा डाव १५३ धावांवर गुंडाळला. भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली.
- - कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सहा विकेट्स शून्यावर पडल्या आहेत. यापूर्वी शून्य धावेवर ४ विकेट्स पडल्याच्या ४५, तर शून्यावर ५ विकेट्सच्या तीन प्रसंग घडलेले.
- - एखाद्या संघाच्या शेवटच्या सहा फलंदाजांनी केलेली ही सर्वात खराब कामगिरी आहे. १९९०मध्ये इंग्लंडचे ६ फलंदाज ३ धावांवर ( वि. ऑस्ट्रेलिया), तर २००१ मध्ये न्यूझीलंडचे ६ फलंदाज ४ धावांवर ( वि. पाकिस्तान) माघारी परतले होते.
- - २०१९मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध आयर्लंड कसोटीत सलामीच्या दिवशी २० धावा पडल्या होत्या आणि त्यानंतर आज असे घडले.
- - कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक २५ विकेट्स पडल्याचा विक्रम १९०२ मध्ये घडलेला. ऑस्ट्रेलियाच्या १५ ( १०-११२ व ५-४८) आणि इंग्लंडच्या ( १०-६१) अशा मिळून १५ विकेट्स पडल्या होत्या.