IND vs PAK Asia Cup 2025: दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे. दोनही संघांनी आपले पहिले सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल, तो संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. एखाद्या संघाला चांगले खेळण्यासाठी चांगल्या सुरुवातीची आवश्यकता असते आणि ही चांगली सुरूवात टॉस जिंकून मिळवता येते. त्यामुळे टॉस जिंकणे भारत किंवा पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचे आहे. दुबईमध्ये सामना जिंकण्यासाठी टॉस जिंकणारा संघ प्रबळ दावेदार असतो. दुबईमध्ये या दोन्ही संघांमधील टी२० सामन्याचा इतिहासही असाच काहीसा कहाणी सांगतो.
जो नाणेफेक जिंकेल तो सामना जिंकेल?
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये ३ टी२० सामने खेळले गेले. त्यात तिन्ही सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला. २०२२ मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना ५ विकेट्सने जिंकला. पुढच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. तर २०२१ मध्ये दुबईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने पराभव केला. याचा अर्थ दुबईमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ नेहमीच अडचणीत सापडलेला दिसतो. हेच कारण आहे की २०२५च्या आशिया कपमध्ये जो संघ नाणेफेक जिंकेल तो धावांचा पाठलाग करण्याची इच्छा व्यक्त करतो. ही बाब केवळ आशिया कपपुरती मर्यादित नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या गेल्या ८ सामन्यांपैकी ७ सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपे
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपे का आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. दुबईची खेळपट्टी सुरुवातीला थोडी संथ असते, त्यामुळे चेंडू अडकतो आणि फलंदाजांना शॉट्स खेळणे सोपे नसते. नंतर, हवामान थंड झाल्यावर, खेळपट्टी वेगवान होते आणि चेंडू बॅटवर चांगला येतो, ज्यामुळे शॉट्स खेळणे सोपे होते. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस जिंकेल तो मॅच जिंकेल, असा सरळ हिशोब असल्याचे बोलले जात आहे.