Sunil Gaaskar on Pakistan Boycott Decision, T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक २०२६ मध्ये १५ फेब्रुवारीला सामना होणार होता. पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद होते, तेव्हा भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर दुबईत खेळवण्यात आले होते. तसेच भारताकडे यजमानपद असलेल्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचे सर्व सामने भारताबाहेर श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार, हा सामना कोलंबो येथे होणार आहे. पण पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
सुनील गावसकर काय म्हणाले?
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकल्याबद्दल दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्यांना चांगलेच सुनावले. गावस्कर म्हणाले की, पाकिस्तान त्यांच्या निवृत्त खेळाडूंप्रमाणेच अनेक या मुद्द्यांवरही यू-टर्न घेऊ शकतो. पाकिस्तानी खेळाडू निवृत्तीबाबत यू-टर्न घेण्यात पटाईत आहेत. शाहिद आफ्रिदी, इमाद वसीम आणि मोहम्मद अमीर सारखे हे याचे उत्तम उदाहरण आहेत. सुनील गावस्कर यांनी आज तकशी बोलताना सांगितले, "पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा निवृत्ती जाहीर केली आहे आणि नंतर त्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. आताचा प्रकारही तसाच असेल. मला वाटते की पुढील चार-पाच दिवसांत जेव्हा जगभरातून आणि त्यांच्या माजी खेळाडूंकडून प्रतिक्रिया येतील, तेव्हा पाकिस्तान आपली भूमिका बदलू शकेल."
सर्वांना त्यांचा इतिहास माहित आहे!
"पाकिस्तानी खेळाडूंनी निवृत्ती मागे घेतल्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. चाहत्यांनी काही कमेंट केली की खेळाडू लगेच निवृत्ती रद्द करतात आणि परत मैदानात येतात. असेच काहीतरी १५ फेब्रुवारीपूर्वीही घडू शकते. जर पाकिस्तानकडे भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचे ठोस कारण नसेल किंवा कराराचे उल्लंघन होत असेल, तर आयसीसी त्यांच्यावर कारवाई करेल यात दुमत नाही", असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, आयसीसीने पाकिस्तानच्या घोषणेवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि असे म्हटले की असा निर्णय खेळाच्या आणि लाखो पाकिस्तानी चाहत्यांसह क्रिकेटचाहत्यांच्या हिताचा नाही. आयसीसीने पीसीबीला या निर्णयाचे दीर्घकालीन आणि व्यापक परिणाम विचारात घेण्यास सांगितले आहेत. कारण याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होऊ शकतो.