ICC vs PCB, IND vs PAK T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अनेक वर्षांपासून तणावाचे आहेत. त्यातच पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हे संबंध अधिकच चिघळले. पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद होते, तेव्हा भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर दुबईत खेळवण्यात आले होते. तसेच भारताकडे यजमानपद असलेल्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचे सर्व सामने भारताबाहेर श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याचा अजब निर्णय घेतला आहे. असे न करण्याचा सल्ला ICC कडून देण्यात आले आहे, पण तसे झाल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ५ गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
पीसीबीविरुद्ध आयसीसी कोणती कारवाई करू शकते?
या प्रकरणात आयसीसी पीसीबीवर काय कारवाई करू शकते? वृत्तसंस्था पीटीआयने आयसीसी बोर्डाच्या सूत्राचा हवाला देत वृत्त दिले आहे की पाकिस्तानचा निर्णय आयसीसी-बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील तटस्थ स्थळांबाबतच्या कराराचे उल्लंघन करतो, जो सर्व पक्षांसाठी अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, पीसीबीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सूत्रानुसार, पीसीबीला पाच वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, किंवा पाचपैकी कोणत्याही एका प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते:
- पाकिस्तान संपूर्ण स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडू शकतो.
- पाकिस्तानला आयसीसीकडून मिळणारा वार्षिक महसूल, जो सुमारे ३५० कोटी रुपये आहे, तो थांबवला जाऊ शकतो.
- भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीसीबीला ब्रॉडकास्टर्स जिओ-हॉटस्टारला करण्यास सांगितले जाऊ शकते, जे सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.
- पीसीबी बंधनकारक कराराचे उल्लंघन करत आहे, म्हणून इतर आयसीसी सदस्य देश पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकांवर बहिष्कार टाकू शकतात किंवा वर्ल्ड ट्रेडिंगमध्ये त्यांना कोणतेही गुण मिळणार नाहीत.
- परदेशी खेळाडूंना (निवृत्त किंवा फ्री एजंट वगळता) पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये सहभागी होण्यास अधिकृतरित्या मनाई केली जाऊ शकते.
भारत वॉकओव्हर करणार...
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाईल. संघ तिथे सराव करेल, पत्रकार परिषदेला उपस्थित राहील आणि सामन्याच्या दिवशी वेळेवर स्टेडियममध्ये पोहोचेल. त्यानंतर पाकिस्तानचा संघ न आल्यास 'वॉकओव्हर' केले जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, जर एक संघ नाणेफेकीसाठी मैदानात उपस्थित राहिला आणि दुसरा संघ आला नाही, तर सामनाधिकारी उपस्थित असलेल्या संघाला 'वॉकओव्हर' घोषित करतात. याचा अर्थ भारतीय संघाला सामना न खेळताच २ गुण मिळतील.