Pakistan Shahbaz Sharif on Ind vs Pak, T20 World Cup 2026: टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार की नाही, यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर २०२६ च्या टी२० विश्वचषकात आमनेसामने येणार होते, परंतु सध्या या सामन्याचे भवितव्य अनिश्चित आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान भारताशी टी२० विश्वचषकाचा सामना खेळू शकणार नाही. हा निर्णय आमच्या सरकारने काळजीपूर्वक विचार करून घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, "आम्ही काळजीपूर्वक विचार करून भारतासोबत सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रात राजकारण होऊ देऊ नये असे आमचे मत आहे. आम्ही बांगलादेशसोबत उभे आहोत आणि आमचा पाठिंब्याचा निर्णय पूर्णपणे योग्यच आहे."
पाक क्रिकेट बोर्ड गप्प
पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पीसीबीने या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या इराद्याबद्दल आयसीसीला कळवले आहे की नाही, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पीसीबीकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच आयसीसीची या प्रकरणावरील भूमिका उघड होईल. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान सामना टी२० विश्वचषक नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच राहील.
नेमका वाद काय?
२०२६ च्या टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही अशी बातमी पहिल्यांदा तेव्हा समोर आली, ज्या दिवशी भारताने पाकिस्तानला १९ वर्षांखालील विश्वचषकात हरवले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्या एक्स हँडलद्वारे सांगितले की ते २०२६च्या टी२० विश्वचषकात सहभागी होतील, परंतु १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीत. बांगलादेशला स्पर्धेतून काढून टाकण्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला पाठिंबा दर्शवला.