IND vs PAK Pakistan Captain Salman Ali Agha Press Conference : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत १५ फेब्रुवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. याआधी दोन्ही संघ मागील वर्षी आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले होत. आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ समोरासमोर येणार असल्याने भारतीय संघ ती ‘नो हँडशेक पॉलिसी’ कायम ठेवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघातील खेळाडू टीम इंडियातील खेळाडूंसोबत हस्तांदोलनासाठी आतूर असल्याचे दिसते. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने यासंदर्भात आपलं मत व्यक्त केले. खेळ भावनेचा उल्लेख करत त्याने हस्तांदोलनाच्या मुद्द्यावर मत मांडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाक खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करणार?
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) याने खेळभावनेवर भर देत भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत पाकिस्तान कर्णधाराने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने हस्तांदोलनाचा वाद पुन्हा निर्माण होऊ नये, अशी भावना व्यक्त केली. सलमान अली आगा म्हणाला की, "क्रिकेट खेळभावनेने खेळले गेले पाहिजे. माझे वैयक्तिक मत कदाचित फारसे महत्त्वाचे नसेल, पण क्रिकेट नेहमी ज्या पद्धतीने खेळले जाते, त्याच पद्धतीने खेळले जावे. पुढे काय करायचे, हे त्यांच्यावर अवलंबून आहे." असे म्हणत भारतीय संघाच्या भूमिकेवर मैदानात काय चित्र दिसेल, ते स्पष्ट होईल, असेच तो म्हणाला आहे.
"जरा जपून..." IND vs PAK यांच्यातील सामन्याआधी हरभजन सिंगचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला...
अभिषेक शर्माबाबतही मोठं वक्तव्य
या पत्रकार परिषदेत आगा याने भारताचा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्याबाबतही प्रतिक्रिया दिली. तो मैदानात उतरेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तब्येत ठिक नसल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. पाकिस्तानविरुद्ध तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. पण पाकिस्तान कॅप्टनला तो मैदानात उतरेल, असे बोलून दाखवले. सलमान अल आगा म्हणाला की, "मला आशा आहे की, अभिषेक शर्मा उद्या खेळेल. आम्हाला सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायचे आहे.ठ
भारताविरुद्ध कमी पडलो याचीही दिली कबूली
सलमान अली आगा यांनी मान्य केले की, या फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध त्यांचा विक्रम समाधानकारक नाही. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आठ वेळा भिडले असून भारताने सात सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ एकच विजय मिळाला आहे.