IND vs PAK: एशिया कप 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत आहे. पण, हा सामना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा सामनाच रद्द करण्याची मागणी होत आहे. अनेकांचे मत हे की, भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पीडित कुटुंबीयांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. दरम्यान, आता या मुद्द्यावर भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाने महत्वाची टिप्पणी केली आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, सुरेश रैनाने सांगितले की, भारतीय संघातील खेळाडूंना आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु परिस्थितीमुळे आणि जबरदस्तीमुळे त्यांना खेळावे लागत आहे. एशिया कपच्या सामन्याला भारत सरकारची मंजुरी मिळाली आहे. बीसीसीआयही कायम म्हणते की, पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही.
मला खात्री आहे की, आशिया कपसाठी निवडलेल्या खेळाडूंना स्वतंत्रपणे विचारले, तर कोणीही पाकिस्तानविरुद्ध खेळायला तयार होणार नाही. मात्र, ही त्यांची मजबुरी आहे. बीसीसीआयने मान्यता दिली आहे आणि हा ACC चा टूर्नामेंट आहे. टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागत आहे, याचे दुःख आहे, अशी प्रतिक्रिया रैनाने दिली.
विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वीच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL 2025) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्या संघात सुरेश रैनाही होता. त्यावर बोलताना रैना म्हणाला, WCL 2025 ही एक खाजगी स्पर्धा होती, जी बीसीसीआयच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय स्वतः घेतलो होता.