IND vs PAK No Handshake: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना आज कोलंबोमध्ये खेळवला जात आहे. मात्र, खेळाच्या मैदानात चेंडू पडण्याआधीच टॉसच्या वेळी एक मोठी घटना घडली. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली 'नो हॅन्डशेक पॉलिसी' कायम ठेवत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हात मिळवण्यास नकार दिला. टॉसच्या वेळी सूर्यकुमारने पाकिस्तानी कर्णधाराकडे साधे पाहिलेही नाही, ज्यामुळे क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर टॉससाठी दोन्ही कर्णधार मैदानावर आले. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, टॉस झाल्यानंतर परंपरेनुसार दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी हात मिळवणे अपेक्षित होते. पण सूर्यकुमारने सलमान अली आगाला पूर्णपणे इग्नोर केले. टॉस प्रेझेंटरशी संवाद साधून सूर्या थेट आपल्या डगआऊटच्या दिशेने निघून गेला.
'नो हॅन्डशेक पॉलिसी'मागचे कारण काय?
भारतीय संघाने ही भूमिका पहिल्यांदा सप्टेंबर २०२५ मध्ये दुबईत झालेल्या एशिया कप दरम्यान घेतली होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे औपचारिक संबंध किंवा मैदानावरील सौहार्द न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. एशिया कपमध्ये तीनवेळा आमनासामना होऊनही भारताने हीच प्रोटोकॉल पाळला होता.
पाकिस्तानचा पवित्रा आणि बीसीसीआयची भूमिका
२०२५ च्या एशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला होता. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला वर्ल्ड कपमध्ये स्थान दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, नंतर ते नमले आणि खेळण्यास तयार झाले. केवळ वरिष्ठ संघच नाही, तर भारताच्या ज्युनियर टीमनेही पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याची हीच पॉलिसी पाळली आहे.
सामन्यापूर्वी रंगले होते 'माईंड गेम्स'
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा सूर्याला हात मिळवण्याबाबत विचारले होते, तेव्हा त्याने हसत उत्तर दिले होते की, "२४ तास वाट पाहा, चांगलं जेवा, चांगली झोप घ्या, उद्या मैदानावर काय होईल ते तुम्हाला दिसेलच." दुसरीकडे सलमान अली आगाने खेळ भावनेने खेळला जावा असे मत मांडले होते, मात्र सूर्याच्या भूमिकेने भारताचा पाकिस्तानबद्दलचा कठोर पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.