IND vs PAK ICC T20 World Cup Controversy ICC Rejects Pakistan's Demands : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यावर बहिष्कार मागे घेण्यासाठी पाकिस्तानने खेळलेला अखेरचा डावही फसला आहे. ICC नं पाकिस्तानच्या तीन प्रमुख मागण्या फेटाळून लावल्या आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानने आपला निर्णय मागे घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी सोमवारी, ९ फेब्रुवारीला आयसीसीच्या अधिकाऱ्यांसह पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर भारत-पाक यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानची पोकळ धमकी, सरकारने केली होती मोठी घोषणा
बांगलादेशच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारतीय मैदानात खेळण्यास नकार दिल्यावर ICC नं त्यांना स्पर्धेतून बाहेर करत स्कॉटलंडचा स्पर्धेत सहभागी करून घेतले होते. या निर्णयाचा विरोध करताना पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी आधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्याची पोकळ धमकी दिली. मग संघाची घोषणा करून टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार, पण भारताविरुद्ध नाही खेळणार, अशी भूमिका घेतली. पाकिस्तान सरकारने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपला संघ १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध खेळणार नाही, अशी अधिकृत घोषणा केली होती. या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने काही नाहक मागण्या करून तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा डावही फसला आहे.
Video: पाकिस्तानी क्रिकेट संघाला श्रीलंकेने हे कुठे नेऊन ठेवले? होम स्टे, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
आपला निर्णय मागे घेण्यासाठी खेळला नवा डाव, तीन प्रमुख मागण्या केल्या, पण...
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळवण्यासाठी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. मात्र ICC ने ही मागणी फेटाळून लावली आहे. द्विपक्षीय मालिका हा ICC च्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अगदी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतही या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, असे ICC ने सांगितले आहे. भारत-पाकिस्तान-बांगलादेश त्रिकोणी मालिका आयोजित करण्याचा प्रस्तावही ICC ने नाकारला आहे. भारताने यंदा बांगलादेशचा दौरा करावा, अशी PCBची मागणीसुद्धा ICC ने फेटाळली.
PCB अध्यक्ष आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय
PCBचे अध्यक्ष मोहसिन नक्वी सध्या पाकिस्तान सरकारशी संपर्कात आहेत. या चर्चांमध्ये आंतरराष्ट्रीय CEO संजोग गुप्ता, आयसीसी असोसिएट्स चेअरमन मुबाश्शिर उस्मानी, तसेच इम्रान ख्वाजा आणि जय शाह हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. सध्या कोणतीही अंतिम मुदत ठरवण्यात आलेली नाही, मात्र लवकरच भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार हे चित्र स्पष्ट होईल.