भारतीय संघाने कोलंबोच्या मैदानात आपला रुबाब कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला. फलंदाजीत ईशान किशनच्या शानदार शोनंतर गोलंदाजीत हार्दिक पांड्या आणि बुमरासह अक्षर पटेलची जादू पाहायला मिळाली. सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठा विजय नोंदवला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला. टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने गोलंदाजीवेळी ६ फिरकीपटूंचा वापर केला. यातील उस्मान तारिक हा गोलंदाज भारत-पाक यांच्यातील हाय-व्होल्टेज लढती आधी गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत होता. या सामन्यानंतर त्याची बॅटिंग शैलीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे.
प्राइम बॉलर १० षटकानंतर गोलंदाजीला आला
भारताविरुद्धच्या सामन्याआधी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि प्राइम बॉलर मानला गेलेला उस्मान तारिक १० व्या षटकानंतर पहिले षटक घेऊन आला. सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्याचे स्वागत केले. त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात फक्त २४ धावा खर्च करत सूर्यकुमार यादवच्या रुपात एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. पाकिस्तानच्या कर्णधाराने खेळलेला हा डाव समजण्यापलिकडचा होता. कारण ज्याची हवा आहे त्या गोलंदाजाकडे त्याने खूपच उशीरा चेंडू सोपवला.
तीन चेंडूत खेळ खल्लास, फलंदाजीत दिसलं गोलंदाजीतील साम्य अन्...
पाकिस्तानच्या डावातील १६ व्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीनं फहीम अशरफ आणि अब्रार अहमद यांना पाठोपाठ तंबूचा रस्ता दाखवला. वरुण हॅटट्रिकवर असताना शेवटच्या विकेटच्या रुपात उस्मान तारिक फलंदाजीला आला. पहिल्याच चेंडूवर तो फसला अन् भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं हॅटट्रिक पूर्ण होईल या आशेनं रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू अपयशी ठरला. पण यादरम्याने पाकिस्तानी मिस्ट्री स्पिनर फलंदाजीतील हटके शैलीमुळे चर्चेत आला.
तो थांबून गोलंदाजी करतोय हे ऐकलं आता तो बॅटिंगही तशीच थांबून करतो ते पाहायला मिळाले, अशी कमेंट आकाश चोप्रानं केली. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या बॅटिंगची अतरंगी स्टाईल चर्चेचा विषय ठरत आहे. हार्दिक पांड्याने तारिकला बोल्ड करत पाकिस्तानचा खेळ खल्लास केला. तो ज्या चेंडूवर बोल्ड झाला त्यावेळीही तो फटका मारताना थोडा थांबला अन् त्याच्यावर क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली.