Mohammed Shami Ramzan Fast: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या ताफ्यातून सर्वोत्तम कमगिरी करणारा जलगती गोलंदाज मोहम्मद शमी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील मौलानाने रमजानच्या पवित्र महिन्याचा दाखला देत शमीवर निशाणा साधलाय. यावर आता शमीच्या कोचची प्रतिक्रिया चर्चेत आहे. आधी देश मग धर्म, असे म्हणत शमीच्या कोचनं मौलानाला सुनावलं आहे. धर्माच्या नावाखाली क्रिकेटरला नाहक ट्रोल करणाऱ्या मंडळींसह मौलानाला शमीचे माजी कोच बदरुद्दीन सिद्दीकी यांनी देशभक्तीचा डोस दिला आहे. एवढेच नाही तर तो सध्या देशासाठी महत्त्वाच्या ड्युटीवर असल्याची जाणीवही करून दिलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी देश, मग... काय म्हणाले शमीचे कोच?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावेळी ड्रिंक्स ब्रेकमधील फोटो व्हायरल झाल्यावर मोहम्मद शमीवर धार्मिक मुद्द्यावरुन निशाणा साधण्यात आला. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये शमी पेय पिताना दिसत आहे. रमजान असून त्याने रोजा पकडलेला नाही, यावरुन शमीला ट्रोल करण्यात येऊ लागले. या मंडळींची तोंडे बंद करण्यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. मोहम्मद शमीचे कोच बदरुद्दीन सिद्दीकी म्हणाले आहेत की, आधी देश, त्याआधी काहीच येत नाही. तो (शमी) नंतरही रोजा करू शकतो. मोहम्मद शमी जे काही करतोय ते देशासाठी करतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आधी खेळाडूंना मानसिक त्रास होईल, अशी वक्तव्ये कुणीही करू नयेत, अशा आशयाच्या शब्दांत त्याने शमीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्या मोलानाला सुनावले आहे.
ड्रिंक्स ब्रेकमधील फोटोवरुन रंगली भलतीच चर्चा, मौलाना म्हणाले शमीनं केला गुन्हा!
रमजान हा मुस्लीम धर्मीयांसाठी पवित्र महिना आहे. या काळात अनेकजण महिनाभर उपवास करतात. दरम्यान मोहम्मद शमीचा ड्रिंक्स ब्रेकमधील फोटो व्हायरल झाला अन् त्याने रोजा ठेवलेला नाही, अशी चर्चा रंगू लागली. देशातील एका लोकप्रिय क्रिकेटरनं रोजा पाळलेला नाही. इस्लाममधील शरियत कायद्यानुसार, हा मोठा गुन्हा आहे, अशा आशयाचे वक्तव्य बरेलीच्या मौलानाने मोहम्मद शमीसंदर्भात केले होते.
मोहम्मद शमी संघातील महत्त्वाचा गोलंदाज
मोहम्मद शमी हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरल्यावर बांगलादेशविरुद्धच्या लढतीत त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ज्या मॅचमधील फोटोवरून त्याला ट्रोल करण्याला सुरुवात झालीये त्या मॅचमध्येही शमीनं भारतीय संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. फायनलमध्येही त्याच्याकडून संघाला अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.