Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND Vs NZ : गेल्यावर्षी कारकीर्द धोक्यात होती - अश्विन

R. Ashwin: ‘गेल्यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझी क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली होती. कारकीर्द आता संपेल, अशी भीती वाटत होती. पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघातून खेळेन, असा विश्वास वाटत नव्हता,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 08:35 IST

Open in App

कानपूर : ‘गेल्यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझी क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली होती. कारकीर्द आता संपेल, अशी भीती वाटत होती. पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघातून खेळेन, असा विश्वास वाटत नव्हता,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला.३५ वर्षीय अश्विनने आपल्या ८० व्या कसोटी सामन्यात ४१९ वा बळी घेत हरभजन सिंगचा (१०३ सामन्यांत ४१७ बळी) विक्रम मागे टाकला. गेल्यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यानंतर कारकीर्द धोक्यात आली असल्याचे वाटत होते, असे अश्विनने सांगितले.बीसीसीआयच्या संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये फलंदाज श्रेयस अय्यरसोबत संवाद साधताना अश्विनने म्हटले की, प्रामाणिकपणे सांगायचे तर, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनदरम्यान माझ्या आयुष्यात आणि कारकीर्दीमध्ये गेल्या वर्षापासून जे काही झाले, त्यावरून मी पुन्हा कसोटी खेळू शकेन का, याबाबत शंका होती. ख्राईस्टचर्च येथे २९ फेब्रुवारी २०२० रोजी झालेला अखेरचा कसोटी सामना मी खेळलो नव्हतो. त्यामुळे मला माझ्या भविष्याची चिंता होती. मला कसोटी संघात स्थान मिळेल का, असा प्रश्न होता. 

हरभजन सिंगकडून प्रेरित होत मी ऑफस्पिन गोलंदाजीला सुरुवात केली आणि आज मी या स्थानी पोहोचलो आहे. मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद भज्जी पाजी! हे शानदार यश आहे. माझ्यासाठी गर्वाची बाब आहे की, याच मैदानावर मी २०० वा कसोटी बळीही घेतला होता आणि याच मैदानावर मी हरभजनची कामगिरी मागे टाकली आहे. 

टॅग्स :आर अश्विनभारतीय क्रिकेट संघ
Open in App